Chandravilas: चंद्र ढगाआड गेला म्हणून अमावस्या... ‘चंद्रविलास’चा हा व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा!
Chandravilas New Promo: या व्हिडीओमध्ये ‘चंद्रविलास’ बनलेले वैभव मांगले आपल्या दमदार आवाजात आणि हटके शैलीत संवाद म्हणताना दिसत आहेत.
Chandravilas New Promo: ‘चिंची चेटकीण’ बनून लहानग्या प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. ‘चिंची’ साकारल्यानंतर आता अभिनेते वैभव मांगले ‘चंद्रविलास’ या मालिकेतून एक वेगळा आणि हटके लूक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या ‘चंद्रविलास’ या नव्या मालिकेचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आऊट झाला आहे. मालिकेचा हा प्रोमो व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
‘चंद्र ढगाआड गेला म्हणून अमावस्या होत नसते रे... चंद्र पुन्हा बाहेर येणार आणि सगळं चांदणं पिऊन टाकणार. माझ्या पाशवी ताकदीसमोर तू नतमस्तक झालास. आता तुझा मुलगाही नतमस्तक होणार!’, असा संवाद या प्रोमोत पाहायला मिळत आहे. ‘चंद्रविलास’ बनलेले वैभव मांगले आपल्या दमदार आवाजात आणि हटके शैलीत हा संवाद म्हणताना दिसत आहेत. तर, त्यांच्यासमोर वाड्याचा मालक बेडवर मरणासन्न अवस्थेत पडला आहे. या गूढ वातावरणात आता ‘चंद्रविलास’ त्याची नवी खेळी खेळणार आहे. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी यांनी त्या वाड्यात परतून यावं, यासाठी चंद्रविलास त्याची चाल आजमावणार आहे.
‘चंद्रविलास’ ही दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची गोष्ट आहे. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी ही बापलेकीची जोडी त्यांच्या गावाच्या एका जुन्या वाड्यात राहायला जाते. मात्र, या वाड्यात पाऊल टाकताच त्यांच्या नशिबाचे फासे पालटतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळाच खेळ सुरू होतो. दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. ‘चंद्रविलास’च्या या खेळात दोघे पुरते अडकले आहेत.
या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा अर्थात ‘चंद्रविलास’ आजही तिथेच अडकून पडला आहे. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, या सगळ्याचा उलगडा या मालिकेच्या येत्या भागांमधून होणार आहे.
विभाग