मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: अभिषेकचं सत्य समजल्यावर काय असणार अनघाचा निर्णय? मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट

Aai Kuthe Kay Karte: अभिषेकचं सत्य समजल्यावर काय असणार अनघाचा निर्णय? मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 12, 2022 03:24 PM IST

Aai Kuthe Kay Karte: एकीकडे अरुंधतीच्या आयुष्याची घडी बसत असताना, दुसरीकडे देशमुखांच्या घरात आणखी अरुंधती निर्माण होणार आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. एकीकडे अरुंधतीच्या आयुष्याची घडी बसत असताना, दुसरीकडे देशमुखांच्या घरात आणखी अरुंधती निर्माण होणार आहे. यावेळी अनघाच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. अनिरुद्धने अरुंधतीची फसवणूक करून संजनाशी संसार थाटला होता. आता त्याचा मुलगा अभिषेक देखील पत्नीची फसवणूक करून, दुसऱ्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवताना दिसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिषेकला दुसऱ्याच एका मुलीच्या हातात हात घालून बसलेला पाहून अरुंधतीचा संताप अनावर झाला आहे. मात्र, आशुतोषच्या सांगण्यावरून तिने सगळी माहिती मिळेपर्यंत शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशमुखांच्या घरात अनघाच्या डोहाळे जेवणाची तयारी सुरु आहे. तर, दुसरीकडे अभिषेक तिला फसवतोय, हा मोठा धक्का देशमुखांना बसणार आहे. अनघाच्या आग्रहामुळे अभिषेक डोहाळेजेवणाआधीच घरी परतला आहे. एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी दिल्लीला जातोय, असं सांगून बाहेर पडलेला अभिषेक मुंबईतच एका मुलीसोबत फिरत होता, हे अरुंधतीला माहित आहे.

इतका वेळ संयम राखून राहिलेली अरुंधती मात्र डोहाळे जेवणाच्या वेळी अभिषेकचा नाटकीपणा पाहून संतापते आणि त्यांच्याकडून खरं कबूल करून घेते. आता अनघाला देखील हे सत्य कळणार आहे. आपल्या पतीचं सत्य कळल्यानंतर संतापलेली अनघा त्याला म्हणते की, यापुढे मी तुझं तोंड देखील बघणार नाही. आधीच तब्येत नाजूक असणाऱ्या, अनघाला या धक्क्यामुळे कळा सुरू होणार असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. मात्र, यानंतर अनघा अभिषेकला सोडून जाणार की, अरुंधतीप्रमाणे खंबीर होऊन या परिस्थितीला सामोरी जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या मालिकेत सुरु असलेल्या या ट्रॅकवर प्रेक्षक देखील टीका करताना दिसत आहेत. ‘आई कुठे काय करते ही मालिका खूप चांगल्या प्रकारे चालली होती. पण, आता ही खूप विचित्र परिस्थिती दाखवत आहे. त्या मालिकेतील प्रत्येक पुरुषाला दोन बायका किंवा स्त्रीला दोन नवरे दाखवत आहेत. हे चांगले नाही. आता अरुंधती आशुतोषशी विवाह करणार. ईशा तिच्या नव्या बॉय फ्रेंडसोबत लग्न करणार. मग, अरुंधती ईशाची सासू बनाणार. काय नात्यांचा नुसता बाजार मांडलाय’, असा प्रश्न एका चाहत्याने कमेंटमध्ये केला आहे.

IPL_Entry_Point