Aditya Thackeray : एकनाथ शिंदे यांच्याकडं पैशांचं गोडाऊन सापडलं होतं; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक दावा
Aaditya Thackeray on Eknath Shinde : मावळ लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे.
Aditya Thackeray on Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदे यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांच्याकडं पैशाचं गोदाम सापडलं होतं. भाजपनं धमक्या सुरू केल्या आणि घाबरून हे भाजपसोबत गेले,’ असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी आज केला.
ट्रेंडिंग न्यूज
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाजप व शिंदे गटावर सडकून टीका केली. ‘देशात भाजपनं चिखल करून ठेवला आहे,’ अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
‘राज्य सरकारांना काम करू दिलं जात नाही. दिल्ली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. अत्यंत भयानक प्रकार आहेत. कोणीतरी आरोप केला, की मग ईडी घरी येते. ऑफर दिली जाते. केजरीवालांनी ही ऑफर धुडकावली. हेमंत सोरेन हेही नीडरपणे भाजपच्या विरोधात गेले. तोच प्रकार महाराष्ट्रात केला गेला. सरकार पाडलं गेलं. मिंधेंच्या रूपानं अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
‘आपल्याकडं जे हे मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसले आहेत, त्यांनाही भाजपनं ऑफर दिली होती. येताय की आतमध्ये टाकू? मग ते दाढी खाजवत रडायला लागले. २० मे रोजी वर्षा बंगल्यावर येऊन रडत होते. हे मला धमकावत आहेत. जेलमध्ये जायचं हे माझं वय नाही. हे मला आत टाकतील. आपण भाजपसोबत जाऊ. हे सगळं रडगाणं वर्षा बंगल्यावर झालं होतं,’ असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
खोटं बोल, पण रडून बोल!
‘भाजपची एक पॉलिसी आहे. खोटं बोला, पण रेटून बोला. मिंधे गँगची पॉलिसी खोटं बोला, पण रडून बोला. एवढाच काय तो या दोघांमध्ये फरक आहे. खोटं दोघंही बोलतात,’ असा खोचक टोला आदित्य यांनी भाजप व शिंदे गटाला हाणला.
४०० पार चंद्रावर करत असेल!
शिवसेना व राष्ट्रवादी सोबत असलेले जे गद्दार आमदार व खासदार भाजपसोबत गेले, त्यांच्या प्रत्येकाच्या विरुद्ध काहीतरी चोरीचे आरोप होते. आता हे सगळे गेल्यावर आता राहिलं काय? त्यामुळं भाजप ४०० पारच्या ज्या घोषणा करतंय त्याकडं लक्ष देऊ नका. ते चंद्रावर ४०० पार करतील. भारतात त्यांना हे शक्य नाही. भाजप इथं २०० पारही करू शकणार नाही, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.