महाराष्ट्रातील सहा गावांचं तेलंगणात सामील होण्यासाठी आंदोलन; ग्रामस्थांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
maharashtra-telangana : सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केल्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील सहा गावांनी तेलंगणात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
maharashtra-telangana border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जत आणि अक्कलकोट या शहरांवर दावा ठोकल्यानंतर दोन्ही राज्यातील सीमावादाचा प्रश्नावरून राजकारण पेटलं आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातल्या सहा गावांनी तेलंगणात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात गावांचा विकास होत नसल्यानं तेलंगणात सामील होण्यासाठी या सहा गावांच्या गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सहा गावांनी तेलंगणात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात माहूर, किनवट, धर्माबाद, उमरी, देगलूर आणि बिलोली या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या सहा गावांच्या आंदोलनाचं नेत्तृत्व 'प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे' ही संघटना करत आहे. या गावातील परिसरात महाराष्ट्र सरकारकडून गेल्या अनेक वर्षात रस्ते, पाणी, वीज आणि शिक्षणाचे प्रश्न मार्गी न लावण्यात आल्यानं लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळंच आता या गावातील नागरिकांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारनं या सहा गावातील समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर ही सर्व गावं तेलंगणात सामील होण्यासाठी ठराव पास करतील, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील तीन शहरांवर दावा ठोकल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कायदेशीर लढाईच्या तयारीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी काही विधिज्ञांची भेट घेत सीमावादाच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील सहा गावांनी तेलंगणात सामील होण्यासाठी आंदोलन सुरू केल्यानं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.