मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  INDIA Alliance Meeting : खर्गेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा; ममतांचा प्रस्ताव, जागावाटपासह ‘या’ मुद्यांवर सहमती

INDIA Alliance Meeting : खर्गेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा; ममतांचा प्रस्ताव, जागावाटपासह ‘या’ मुद्यांवर सहमती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 19, 2023 10:18 PM IST

INDIA Opposition Alliance Meeting : इंडिया आघाडीची चौथी बैठक आज दिल्लीत पार पडली. यामध्ये २८ पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार, जागावाटप, ईव्हीएम आदि मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

INDIA Alliance Meeting
INDIA Alliance Meeting

INDIA Alliance Meeting : विरोधी इंडिया आघाडीची चौथी बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत २८ पक्षांच्या नेत्यांनी व प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. आजच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच बऱ्यात मुद्यांवर सहमती बनवण्यात आली. जागावाटप, पंतप्रधानपदाचा उमेदवार, संयुक्त रॅली आदिवर चर्चा करण्यात आली. १४९ खासदारांचे संसदेतून निलंबन, नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल यानंतर इंडिया आघाडीच्या या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यात यावे, असा प्रस्ताव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ठेवला. याला आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला. या बैठकीत संसद सुरक्षेतील त्रुटीबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीत मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, सर्वात आधी आपण निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आमचे प्राधान्य जिंकण्यावर आहे. खासदारच नसतील तर पंतप्रधान पदाबद्दल काय बोलणार? संख्या वाढवण्यासाठी एकत्र लढून बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करू. मोदींना प्रचंड गर्व आला आहे की, संपूर्ण जगात मीच एकटा नेता आहे. त्यामुळे आपला आधी निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न असला पाहिजे.

जागा वाटपाबाबत खर्गे म्हणाले की, सर्वांनी एकत्र येईन लढा द्यायचा आहे. त्या-त्या राज्यात स्थानिक नेतृत्व जागावाटपाबाबत एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. त्यात काही मार्ग न निघाल्यास आम्ही हस्तक्षेप करू. वाद झाल्यास आघाडीचे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करतील. केरळ, तामिळनाडू,  कर्नाटक,  तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेशातील समस्या यामुळे सुटतील. दिल्ली आणि पंजाबमध्येही आघाडी होईल आणि तिथली स्थानिक समस्या दूर होईल. इंडिया आघाडीतील जागा वाटपाबाबत जानेवारीमध्ये पुन्हा बैठक होऊ शकते. त्यामध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.

आजच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांमध्ये ईव्हीएमवर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पाच सदस्यीयनॅशनल अलायन्स समिती स्थापन केली असून यामध्येअशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचा समावेश करण्यात आला आहे. मुकुल वासनिक यांना समितीचे समन्वयक करण्यात आले आहे

IPL_Entry_Point