नेहरू आणि वाजपेयींच्या मूर्खपणामुळं तैवान व तिबेटवर चीनचा ताबा: स्वामी
MP Subramanian Swamy : माजी केंद्रिय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी तिबेट आणि तैवानच्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान नेहरू आणि वाजपेयींवर टीका केली आहे.
Subramanian Swamy On Former PM Pandit Nehru : 'माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आणि अटलबिहारी वाजपेयींच्या मूर्खतेमुळंच भारतानं तैवान आणि तिबेट चीनच्या ताब्यात गेलं', असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी नेहरूंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, चीन कधीही भारत आणि चीनमध्ये असलेली बॉर्डर एलएसीचं सन्मान करत नाही, भारताच्या लडाखच्या काही भागांतही चीननं ताबा मिळवलेला असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, की तिथं कुणीही आलेलं नाही, हा खुलासा स्तब्ध करणारा असल्याचं म्हणत त्यांनी मोदींनाही टोला लगावला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
याशिवाय त्यांनी ट्विटमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भारतीयांना नेहरू आणि वाजपेयींच्या मूर्खतेमुळंच तैवान आणि तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्य करावं लागलं. त्यामुळं आता त्यांच्या या विधानावर राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
माजी केंद्रिय मंत्री आणि सध्या खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच रोखठोक मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकदा भाजपच्या शीर्ष नेत्यांवर आगपाखड केलेली आहे. त्यामुळं त्यांनी आता यावेळी माजी पंतप्रधान नेहरू, वाजपेयींसह सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टिकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान काल अमेरिकेच्या सिनेटर्स नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये वाद पेटला आहे. चीननं दिलेल्या इशाऱ्यानंतरही नॅन्सी पेलोसींनी तैवानचा दौरा केला होता. त्यानंतर आता चीननं अमेरिकेवर आर्थिक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमिवर आता सुब्रमण्यम स्वामी यांनी मत व्यक्त केलं आहे.