देशातील सर्व प्रश्न सोडून मोदी तुमच्यासमोर देवाचा मुद्दा घेऊन येणार, मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
Mallikarjun Kharge on Narendra Modi: आम्ही इंग्रजांशी लढून त्यांना देशातून पळवून लावले. मग आम्ही मोदी, भाजप आरएसएसला कसे घाबरेन. हे लोक डरपोक आहेत. हे लोक भीतीने ब्रिटिशांसोबत काम करत होते. घाबरून माफीनामा लिहून देत होते, असा घणाघात मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप व आरएसएसवर केला.
काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने नागपुरात काँग्रेस महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अयोध्येत मोठ्या धूमधडाक्यात सुरू असलेल्या राम मंदिर सोहळ्यावरूनही खर्गे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. देशात महागाई, बेरोजगारी असे लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र मोदी लोकांच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रश्न सोडून देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येतील, मात्र तुम्ही याला भुलू नका. देशाला वाचवण्यासाठी संविधानच आवश्यक असल्याचं खर्गे म्हणाले.
ट्रेंडिंग न्यूज
खर्गे म्हणाले नागपूर सारख्या पवित्र स्थानावर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी काम केले व सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला. नागपूर क्रांतीकारकांची भूमी आहे. याच भूमीवर डॉ. आंबेडकरांनी लाखो लोकांना एका विचारधारेशी बांधले. नागपूरमध्ये एकीकडे विकासाची, प्रगतीची विचारधारा आहे तर दुसरीकडे RSS ची विचारधारा आहे, जी देशाला बर्बाद करत आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मणिपूर हिंसाचारात जळत आहे. स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, लहान मुलांना मारलं जात आहे. मात्र मोदी तिथं जात नाहीत. ते गुजरातमध्ये डायमंड व्यापाराचं उद्घाटन करायला मात्र जातात. पंतप्रधान व गृहमंत्री संसद सोडून बाहेर फिरत आहेत. भाजपच्या एका खासदाराच्या पासवर तरुणांनी संसदेत घुसखोरी केली. मात्र या एका खासदाराला वाचवण्यासाठी मोदींनी विरोधकांच्या १४६ खासदारांचं निलंबन केलं आणि म्हणतात विरोधकांमुळे संसदेचे कामकाज चालत नाही. ही लोकशाही आहे का? असा सवाल खरगेंनी विचारला आहे.
आज महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्याबद्दल मोदी सरकार काहीही बोलत नाही. केंद्र सरकारमधील ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत. ती भरली जात नाहीत. देशातील उपेक्षित, वंचित घटकातील लोकांना नोकरीपासून वंचित ठेवले जात आहेत. मात्र कुठेतरी रोजगार मेळावा घेऊन आठ-दहा हजार नोकऱ्या दिल्या जातात आणि त्याची मोठी जाहीरातबाजी केली जात असल्याची टीका खर्गे यांनी केली.
विभाग