Pune Murder Case : पानटपरीवरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या; पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
Pune Murder Case : मृत आशिष कांबळेचा रात्री खडकी परिसरातील एका पानटपरीवर काही जणांशी वाद झाला होता. परंतु शिवीगाळ झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली.
Khadki Pune Murder Case Today : रात्री पानटपरीवर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पुण्यात तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं शहरातील खडकी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सिंहगड रोडवर एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता खडकी परिसरात तरुणाचा खुन झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकीत आशिष कांबळे नावाच्या तरुणानं पानटपरी टाकली होती. त्याला काही तरुणांनी विरोध केला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर हा वाद मिटला होता. परंतु आरोपींनी सूडाच्या भावनेनं आशिषवर पाळत ठेवलेली होती. जेव्हा रात्री आशिष पानटपरीवर आला तेव्हा आरोपींनी त्याच्यासोबत हुज्जत घातली. यावेळी आशिष आणि आरोपींमध्ये वादावादी होऊन शिवीगाळ झाल्यानंतर आरोपींनी एकट्या आशिषवर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी आशिषवर धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर स्थानिकांनी आशिषला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर पोलिसांनी खडकी परिसरात सर्च ऑपरेशन राबवत दोन आरोपींना अटक केली असून आशिषची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील विविध भागांमध्ये सातत्यानं हत्याकांडाच्या घटना समोर येत असल्यानं शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.