Mumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' विभागांमध्ये उद्या, परवा पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : पाइपलाइन दुरुस्तीसाठी तसेच भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे ३० आणि ३१ जानेवारी रोजी मुंबईच्या पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे. यमूळे नागरिकांनी काळजी पूर्वक पाणी वापरावे असे, आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : महानगर पालिकेतर्फे भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ४,००० मिमी व्यासाची अतिरिक्त जलवाहिनी जोडण्यात येणार आहे. या सोबतच नवीन जलवाहिन्यांची जोडणी व गळतीची दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याने मुंबईत उद्या ३० जानेवारी पासून सकाळी १० ते ३१ रोजी सकाळी १० पर्यंत अनेक भागात पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. यामुळे पाणी जपून वापरावे तसेच दोन दिवस पुरेल एवढा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबई महानगरपालिका क्षेत्राला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेतले आहे. भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे देखील हाती घेतले आहेत. ही कामे दोन दिवस चालणार आहेत. यामुळे, सोमवारी (दि ३०) सकाळी १० वाजेपासून दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि ३१) सकाळी १० पर्यन्त पालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा हा पूर्ण पणे बंद राहणार आहे. तर २ विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे असल्याची माहिती पालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.
पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.
वरील व्यतिरिक्त 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या २ विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात पुढील दोन दिवस २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. धारावी परिसरातील दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पुढील दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.