Saamana Editorial: शेतकऱ्यांनी गावं विकायला काढलीत, राज्यपालांना माहितीये का? ठाकरेंचा सामनातून सवाल
Uddhav Thackeray : राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यावरून आज उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari : राज्यात परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकं पाण्याखाली गेली असून आता याच मुद्द्यावरून शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भारतीय जनता पक्षावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे. राज्यातील शेतकरी त्याच्या पिकासह पाण्यात वाहून गेला असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रुसून बसले आहेत. एकमेकांवर दररोज चिखलफेक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आणि राज्यपालांना शेतकरी संकटात आलाय, याची माहिती आहे का?, असा सवाल करत शिवसेनेनं भाजपसह राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या कुठे आहेत, कुठे भूमिगत झालेत, याचा कुणी खुलासा करेल का? राज्यपाल राजभवनात नसून ते कुठे आहेत, याचा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी खुलासा करायला हवा. ठाकरे सरकारच्या काळात सतत काम करून राज्यपालांची दमछाक व्हायची, परंतु आता त्यांची दिवाळी थंड झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं असताना आणि शेतकऱ्यांनी गावं विकायला काढल्याची माहिती राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांना आहे का?, असा सवाल करत शिवसेनेनं सत्ताधारी भाजप-शिंदे गट आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.
नेत्यांचा तो स्नेह इतर वेळी कुठे अदृश्य होतो?
महाप्रलयामुळं राज्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी काही बरी नाही. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकं वाहून गेल्यामुळं शेतकरी संकटात सापडलेला आहे. काही दिवसांत ओला दुष्काळ जाहीर होईल, परंतु नेतेमंडळी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकत्र येतात आणि वानखेडे मैदानावर स्नेहभोजन करतात, त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचेही लोक होते, परंतु शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय येतो, तेव्हा हा स्नेह कुठे अदृश्य होतो?, असा सवाल शिवसेनेनं सामनातून विचारला आहे.