Political Crisis : शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने निर्णय घ्या, ठाकरे गटाकडून उपाध्यक्षांना पत्र
Shiv Sena MLA Disqualification : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Shiv Sena MLA Disqualification : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने शिवसेनेतील बंडखोर १६ आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेतील ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना ७९ पानांचं निवेदन देत बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार आणि कायद्याच्या चौकटीत राहुनच योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून पुढील रणनीती आखळी जात आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना विधीमंडळात जाऊन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे. त्यामुळं आता शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय कधी घेतला जाणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितलं आहे. परंतु त्यासाठी कोणतीही डेडलाईन निश्चित केलेली नाही. त्यामुळं आता आमदारांच्या अपात्रतेवर कधी व कोणता निर्णय घ्यायचा, हे सर्वस्वी विधानसभेच्या अध्यक्षांवर अवलंबून आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत ते सूरतमार्गे गुवाहाटीत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत, आमदार अब्दुल सत्तार, आमदार यामिनी जाधव, आमदार संदीपान भुमरे, आमदार भरत गोगावले, आमदार संजय शिरसाठ, आमदार लता सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार बालाजी किणीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अनिल बाबर, आमदार संजय रायमूलकर, आमदार रमेश बोरनारे, आमदार चिमणराव पाटील आणि आमदार महेश शिंदे या आमदारांचा समावेश होता.