Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, उकाड्यामुळं नागरिक हैराण, आरोग्य विभागाचा हाय अलर्ट
Maharashtra Weather Update : गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather Update : गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये होत असलेल्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आता मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळं नागरिक हैराण झाले असून उष्णाघातामुळं आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता राज्यातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे. रविवारी आणि सोमवारी राज्यातील नाशिक, मालेगाव आणि अकोला जिल्ह्यातील तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलं आहे. त्यामुळं आता वाढत्या उष्णतेपासून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उत्तर महराष्ट्रातील नाशिक, मालेगाव जळगाव आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपुरात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. मालेगाव आणि अकोल्यात तापमान चाळीशीपार गेलं आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, जालना, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचं तापमान ३५ अंशावर पोहचलं आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेमुळं नागरिकांची लाही-लाही होत आहे. दुसरीकडे राज्यातील आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. उष्माघातामुळं लोकांचा मृत्यू होत असल्यामुळं आरोग्य विभागाकडून अनेक पथकं नेमण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्याच्या तापमाना अचानक वाढ झाल्याने चिंता वाढल्या आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमानात वाढ झाल्यामुळं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यातील केळीच्या बागा सुकल्या आहे. केळीची शेकडो झाडं उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळं राज्यातील बळीराजा संकटात सापडेला असतानाच आता वाढल्या तापमानामुळं फळबागांचं नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हं आहे.