Supreme Court : राज्याच्या सत्तासंघर्षावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी
Supreme Court : राज्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस आहे. राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार आहे. या सोबतच रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबद देखील निकाल लागणार आहे.
दिल्ली : राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात दाखल असून यावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यानंतर आता कोर्ट काय निकाल देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सोबतच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत देखील सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. या दोन्ही प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
शिवसेनेत बंड होऊन राज्यात सत्ता बदल झाला. हा सत्ता बदल बेकायदेशीर असून या बाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गेल्या ७ महिन्यांपासून या बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडली. या सत्ता संघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टी आधीच पूर्ण करण्याचा घटनापीठाचा इरादा होता. पण युक्तिवाद लांबल्यामुळे ती पूर्ण होऊ शकली नव्हती. मात्र, आज या संदर्भात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कपिल सिब्बल यांनी हे बंड बेकायदेशीर असल्यास फुटून गेलेले आमदार यांच्यावर पक्षांतर बंदी प्रमाणे करण्यात आलेली कारवाई बरोबर असून ही बंड घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर हरिष साळवे म्हणाले, उद्धव ठाकरेंना राजीनामा दिला तिथेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विषय संपला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. सध्या हे प्रकरण पुस्तकी आहे. त्यामुळे जे आमदार १६ अपात्र झाले तोच मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर आहे. यात राज्यपालांची भूमिका योग्य होती. असे देखील ते म्हणाले. दरम्यान, दोन्ही युक्तवाद पूर्ण झाले असून आजच्या सुनावणीत न्यायालय काय बाजू मांडेल ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या सोबतच दुसरी महत्वाची सुनावणी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आहे. आज सकाळच्या सत्रात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.