Sanjay Raut : देशावर हिंदूंचं राज्य असतानाही आक्रोश मोर्चा निघणं दुर्दैवी; संजय राऊतांचा भाजपला टोला
Sanjay Raut On Jan Aakrosh Morcha : मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते, परंतु केंद्रातील मोदी सरकारनं पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केल्याचं सांगत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.
Sanjay Raut On Jan Aakrosh Morcha : लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्याबंदीच्या कायद्यांसाठी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहे. पुण्यानंतर आज मुंबईतही भाजपकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता भाजपच्या हिंदू जनआक्रोश मोर्चावर शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या शक्तिमान हिंदू नेत्यांचं राज्य असतानाही हिंदू जनआक्रोश मोर्चे निघणं दुर्दैवी असल्याचं सांगत राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
सत्तांतर झाल्यापासून राज्यात हिंदूंचं राज्य आल्याचं सांगितलं जात आहे. स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना काहीच मिळत नसल्यामुळं हिंदूंचा आक्रोश योग्यच आहे. भारतात शक्तिमान हिंदू नेत्यांचं राज्य असतानाही काश्मिरी पंडित न्यायासाठी आक्रोश करत आहेत. ज्या मुलायमसिंह यांनी कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते, त्यांचा मोदी सरकारनं पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. त्याचा निषेध करण्यासाठीच भाजपकडून हिंदू जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहे. भाजपनं काढलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चातील कार्यकर्त्यांना मुंबईतील शिवसेना भवनासमोर येऊन आक्रोश करावा लागला. कारण हिंदूंचा आवाज ऐकणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असल्याचं सांगत शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे प्रयत्न- राष्ट्रवादी
भाजपच्या हिंदू जनआक्रोश मोर्चातून जाती-धर्मात लव्ह जिहाच्या नावाखाली विष पेरलं जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती-धर्मात तेढ केला जात आहे. परंतु हिंदू जनआक्रोश मोर्चे निघत असताना त्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता, तसा तो होताना दिसत नसल्याचं सांगत अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे.