Mumbai Local: दिवाळीनंतर कामावर परतणाऱ्या नोकरदारांना फटका; मध्य रेल्वे विस्कळीत
Mumbai Local Train Delay: सकाळी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेमार्गावर एका रेल्वेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळं लोकल रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानं त्याचा फटका प्रवाशांना बसला.
Mumbai Local Train Delay: दिवाळीच्या सुट्टी संपल्यानंतर आता कर्मचारी कामावर परतत असताना आज सकाळी अचानक अंबरनाथ-बदलापूर लोहमार्गावर एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं रेल्वेसेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं तासाभरापेक्षा जास्त वेळ अनेक लोकल ठप्प झाल्यानं त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला आहे. अनेक रेल्वे २५ ते ३० मिनिटांच्या उशिरानं धावत असल्यानं लोकांना कामावर पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागला.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अंबरनाथ-बदलापूरच्या रेल्वेमार्गावर एका रेल्वेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळं रेल्वेसेवा ठप्प झाली. परिणामी मार्गावरील इतर रेल्वेंचंही वेळापत्रक कोलमडलं. डाउन लाईनवर एस-३ सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे प्रशासनानं रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
रेल्वेत तब्बल एक तास अडकून पडल्यानं अनेक प्रवासी वैगातले होते. अनेकांना ऑफिसला पोहचण्यासाठी उशिर झाला होता. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला की त्याचा सर्वाधिक त्रास मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो, असं प्रवासी रवी गांगुर्डे म्हणाले. याशिवाय या मार्गावर आधीच कमी प्रमाणात रेल्वे धावतात आणि त्यात अशा अडचणी निर्माण झाल्यानं अजून गर्दी वाढत जाते, असं म्हणत त्यांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचंही वेळापत्रक कोलमडलं...
अंबरनाथ-बदलापूर रेल्वेमार्गावरील लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं बिघाड दूर केला. परंतु तोपर्यंत कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेंच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळं अनेक रेल्वे २५ ते ३० मिनिटांच्या उशिरानं सुरू होत्या.