Sharad Pawar Live : संभाजीनगरमध्ये कुणी औरंगजेबाचा फोटो दाखवला तर पुण्यात आंदोलन का होतं?; पवारांना शंका
sharad pawar live : विशिष्ट विचारसरणी तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी हिंसाचार होत असताना सत्ताधारी अशा घटनांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही पवारांनी केला.
sharad pawar on kolhapur violence : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये धार्मिक हिंसाचार होत असल्याच्या घटना समोर येत आहे. संभाजीनगर, अकोला, अमरावती, शेवगाव, संगमनेर या शहरात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याच्या घटना समोर उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर आता सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेयर केल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे. शहरातील बिंदू चौकात दोन गटात वाद झाल्यानंतर पोलिसांनी कोल्हापूर शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय येत्या १८ जून पर्यंत कोल्हापुरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु आता राज्यातील हिंसाचाराच्या घटनेवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला आहे.
संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, संगमनेर आणि कोल्हापुरात पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या आहे. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही, असं म्हणत शरद पवारांनी हिंसाचारावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांत दंगलसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवलं जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे?, असा सवालही पवारांनी उपस्थित केला आहे. याशिवाय राज्यातील सत्ताधारी हिंसाचाराच्या घटनांना प्रोत्साहित करत असून हे राज्य आणि समाजासाठी घातक असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ओडिशासह देशातील काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलीस कारवाई करावी. मात्र तसं न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही, असं म्हणत पवारांनी भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.