BMC Election : गुजरातमध्ये झालं तेच मुंबईत होणार; मंगलप्रभात लोढांचा दावा
Gujarat Assembly Elections 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांत भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळं आता भाजपनं गुजराप्रमाणेच मुंबईतही विजयाचा दावा केला आहे.
Mangalprabhat Lodha On BMC Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांत भाजपनं १८२ जागांपैकी तब्बल १५१ जागांवर आघाडी घेत सलग सातव्यांदा बहुमतानं सत्तास्थापनेच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेसचा गुजरातमध्ये सुपडा साफ झाला असून आघाडी कायम राखली तर भाजपनं आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरणार आहे. परंतु आता गुजरातच्या निकालानंतर त्याचे महाराष्ट्रातही पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्यांनी गुजरातमधील विजयाआधीच जल्लोष करायला सुरुवात केली असून गुजरातप्रमाणेच मुंबई महापालिका निवडणुकीतही विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं आता भाजप आणि शिवसेनेत पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये विजयाकडे घेऊन जाणारी मोठी आघाडी मिळाल्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांनी गुजरातप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही विजयाचा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, गुजरातमधील आमचा हा विजय आगामी मुंबई महापालिकेतील विजयाची नांदी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पावती लोकांनी भाजपला दिली आहे. त्यामुळं आता गुजरातप्रमाणेच आम्ही मुंबई महापालिकेत मोठ्या बहुमतासह सत्तेत येणार असल्याचा दावा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही गुजरातमधील यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
आप आणि भाजपनं साटंलोटं केलं- संजय राऊत
गुजरातमध्ये भाजपनं विजयासाठी आम आदमी पक्षासोबत साटंलोटं केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. दिल्ली महापालिकेतील विजयाच्या बदल्यात आपनं गुजरातमध्ये कॉंग्रेसची मतं खाल्ली आहेत, त्यामुळंच भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.