Weather News: राज्यात एकिकडे उष्णतेची लाट पसरली आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असून पुढील ३-४ तासांत मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती, बुलढाणा, वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई हवामान विभागाने आज दुपारी ०४.०० वाजता जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, पुढील ३- ४ तासांत सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या भागात ३० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.तसेच निर्जन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सांगली, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील ३-४ तास विजांच्या कडकडाटासह ३० - ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून काही भागांत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय, बुलढाणाच्या शेगाव येथेही पावसाच्या सरी कोसळल्या. अकोल्यात तुरळक ठिकाणी आज पाऊस झाला. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव येथे अजूनही उकाडा कायम आहे.
उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारखी राज्ये कडक उष्णतेमुळे होरपळत आहेत. डोंगराळ भाग वगळता जवळपास संपूर्ण भारतामध्ये कडक उष्णतेने कहर पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. बिहार आणि बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. हवामान विभागाने १३ राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला. ओडिशाच्या काही भागात तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. बंगाल आणि यूपीमध्येही पारा ४० च्या पुढे गेला आहे.
संबंधित बातम्या