Akola Voilence : अकोला हिंसाचार प्रकरणात ३० आरोपींना अटक, पोलिसांकडून दंगलखोरांची धरपकड
Akola Voilence Case : अकोल्यातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.
Akola Voilence Case : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुऱ्यातील हिंसाचाराची घटना ताजी असातानाच आता अकोल्यातील हरिहरपेठ येथे मध्यरात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणामुळं राज्यात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर जमावाने दुचाकी तसेच चारचाकी वाहनं जाळली होती. तसेच पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता अकोला पोलिसांनी आरोपींची ओळख करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३० दंगलखोरांना अटक केली जात असून अन्य आरोपींची धरपकड केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातील हिंसाचार प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जारी केले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेयर करण्यात आल्यानंतर अकोल्यात मध्यरात्री हिंसाचार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हिंसाचारात १० जण गंभीर जखमी झाले आहे. त्यानंतर शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय शहरात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. पोलिसांकडून अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्तापित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर आता पोलिसांनी मध्यरात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३० आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
अकोला शहरात मध्यरात्री जातीय तणाव निर्माण झाला होता, त्यातूनच दोन गटात मोठा हिंसाचार झाला. आरोपींनी शहरातील अनेक वाहनं जाळली असून दगडफेकही करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आता आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे.