Suicide Case: राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आठ महिन्यांत ३८४ आत्महत्या; महिलांची संख्या सर्वाधिक
Suicide Case : अतिशय क्षुल्लक कारणांवरून राज्यात तरुण मुली आणि महिला आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Suicide Cases In Maharashtra : राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा आणि बीड हे जिल्हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहेत. या भागांमध्ये नापिकी आणि सततच्या दुष्काळामुळं हजारो शेतकऱ्यांनी जीवन संपवलेलं आहे. परंतु आता चालू वर्षातील आत्महत्यांच्या आकडेवारीचा एक अहवाल समोर आला असून त्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्यांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. परंतु या विशेष बाब म्हणजे आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांसह विद्यार्थी, मुली आणि विवाहित महिलांची संख्या लक्षणीय आहे.
रिपोर्टनुसार बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत तब्बल ३८४ लोकांनी आत्महत्या केलेली आहे. आयुष्यातील नैराश्य, व्यसनाधीनता, नापिकी, दुष्काळ, दुर्धर आजार, कौटुंबिक कलह, करियरची चिंता, स्वत:बद्दलचा न्यूनगंड आणि संपत्तीच्या वादातून बीड जिल्ह्यात आत्महत्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
बीड जिल्ह्याचं भीषण वास्तव...
गेल्या आठ महिन्यांत बीड जिल्ह्यामध्ये ३८४ लोकांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे प्रत्येक १६ तासाला बीडमध्ये एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याचं अहवाल सांगतो. याशिवाय या आत्महत्यांमध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त असून त्यानंतर विद्यार्थी, महिला आणि तरुणींचा समावेश आहे.
काय आहे बीड जिल्ह्याचा रेकॉर्ड?
२०२० मध्ये बीड जिल्ह्यात एकूण ६५७ लोकांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये हा आकडा वाढून तो ६३३ पर्यंत पोहचला आणि आता केवळ आठ महिन्यांतच ३८४ जणांनी आयुष्याला कंटाळत मृत्यूला कवटाळलं आहे. यात शेतकऱ्यांपाठोपाठ तरुणा मुलं-मुलींचीही संख्या वाढत असल्यानं चिंता वाढली आहे.
विवाहित महिलांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं...
बीड जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३३ विवाहित आणि १९ नवविवाहित महिलांनी आत्महत्या केली आहे. या महिलांच्या आत्महत्यांमागे घरगुती हिंसाचार, पतीची व्यसनाधीनता, हुंडा आणि छळवणूक अशी कारणं आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यात आत्महत्यांचं वाढतं प्रमाण चिंताजनक ठरत आहे.