Shinde Group : सत्ता बदलली पण यंत्रणा नाही; सत्तारांनंतर ‘या’ आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर
Clashes In Shinde Group : काही दिवसांपूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता शिंदे गटाच्या एका आमदारानं थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिला आहे.
MLA Dilip Lande On CM Eknath Shinde : काही दिवसांपूर्वीच जळगावातील एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या मंत्र्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुलाबराव पाटलांवर व्यासपिठावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय त्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवाला शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानं शिंदे गटात काहीही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई उपनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लांडे यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कामं होत नसल्याची तक्रार करत राज्यातील सरकार बदललं पण यंत्रणा नाही, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी मुंबई उपनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलं आहे. याशिवाय त्यांनी सरकारमधील निधीवाटपातील असमानतेवरही बोट ठेवलं आहे.
प्रशासकीय अधिकारी खोटी माहिती देतायंत- लांडे
राज्यातील सरकार बदललं पण व्यवस्था नाही, प्रशासकीय अधिकारी वेळच्या वेळी कामं करत नाहीये. याशिवाय ते मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती सादर करत असल्याचा आरोपही त्यांनी बैठकीत केला आहे. शासनाच्या मालकीच्या जागेवर जिल्हाधिकाऱ्यांना नाम फलक लावण्याची सूचना केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं आमदार लांडे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
मीटिंगमध्ये आमदारांनी फक्त नाश्ता करायचा का?
प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊनही ते कामच करत नसतील तर डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये येऊन आमदारांनी फक्त नाष्टाच करायचा का?, असा सवाल लांडे यांनी उपस्थित केला. आमदारांना नाष्टा देऊन तोंड बंद करायचं असेल तर हे माझ्याकडून होणार नाही, असंही लांडेंनी स्पष्ट केला.