Devendra Fadnavis : भगतसिंह कोश्यारींच्या खळबळजनक दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Devendra Fadnavis : विधानपरिषदेत आमदारांची नियुक्ती करण्यासाठी ठाकरेंककडून धमकी देण्यात आली होती, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.
Devendra Fadnavis On BS Koshyari : महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी विविध माध्यमांना मुलाखती देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त १२ आमदारांची नियुक्ती करण्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे धमकी दिल्याचं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतर आता कोश्यारींच्या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी भगतसिंह कोश्यारी यांना अजित पवार यांनी नाही तर उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिलं होतं. भगतसिंह कोश्यारी यांची मुलाखत मी पाहिलेली नाही. परंतु त्यात त्यांनी केलेला दावा हा योग्य असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. राज्यपालांना पत्र लिहिताना तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा फॉर्मॅट बदललेला नव्हता. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या पत्रानंतर राज्यपालांनी योग्य फॉर्मॅटमध्ये पत्र पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु त्यातही उद्धव ठाकरेंनी ईगो दाखवल्यामुळं तो प्रश्न रखडत गेल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.
भगतसिंह कोश्यारींचा आरोप काय होता?
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाची उद्धव ठाकरेंनी मला धमकी दिल्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला होता. पंधरा दिवसांच्या आत किंवा त्याआधी आमदारांची नियुक्ती करण्याची धमकी मला देण्यात आली होती, मी राज्यपाल होतो, कुणाचा नोकर नाही, असंही कोश्यारी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं.