राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वॉरंट जारी; सुनावणीवेळी कोर्टानं वकिलांना झापलं
Court Issue Warrant Against BJP Leaders : एका खटल्याच्या सुनावणीवेळी मंत्री लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दांडी मारल्यामुळं संतापलेल्या न्यायाधीशांनी त्यांच्या वकिलांना खडेबोल सुनावले.
Court Issue Warrant Against Mangalprabhat Lodha And Rahul Narvekar : मुंबईतील बेस्टच्या वीज दरवाढीविरोधात केलेल्या आंदोलनावेळी महाव्यवस्थापकांना मारहाण केल्यावरून मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता सातत्यानं या खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहणाऱ्या मंत्री लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोर्टानं वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळच्या आणि विश्वासू मानला जाणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी लोढा आणि नार्वेकरांनी हजेरी न लावल्यामुळं न्यायाधीशांनी त्यांच्या वकिलांना चांगलंच झापल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कोरोना महामारीच्या काळात मुंबईतील अनेक भागांमध्ये लोकांना भरमसाठ वीजबिले आली होती. त्याविरोधात लोढा आणि नार्वेकर यांनी आंदोलन करताना महाव्यवस्थापकांच्या ऑफिसमध्ये राडा करत त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांसह वीस जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर दोन्ही नेते कोर्टात हजर झाले नाहीत. याबाबत न्यायाधीशांनी विचारल्यानंतर ते बैठकीसाठी गेलेले असल्यानं त्यांना येण्यास उशीर होईल, असं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आता तुम्हीच सांगा, काय करायचं?, असा सवाल न्यायाधीशांनी भाजप नेत्यांच्या वकिलांना केला. याशिवाय त्यांना कॉल करून बोलवा असं म्हणत न्यायाधीशांनी नार्वेकर आणि लोढा यांच्याविरोधात वॉरंट जारी केलं आहे.
आजची सुनावणी संपल्यानंतर पुढची सुनावणी येत्या नऊ फ्रेब्रुवारीला होणार आहे. महावितरणच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याप्रकरणातील २० आरोपींविरोधात कोर्टानं वॉरंट जारी केल्यानंतर त्यातील १२ आरोपींनी तातडीनं कोर्टात धाव घेत हजेरी लावली. परंतु तोपर्यंत सुनावणी संपलेली होती. याशिवाय वॉरंटही जारी करण्यात आलेलं होतं. त्यामुळं आता पुढच्या सुनावणी कोर्ट या प्रकरणात काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.