मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : ‘बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा’, शरद पवारांची कर्नाटकच्या डॉक्टरांना गुगली

Sharad Pawar : ‘बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा’, शरद पवारांची कर्नाटकच्या डॉक्टरांना गुगली

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 21, 2023 10:06 PM IST

Sharad Pawar In Pune : शरद पवार नेहमीच बेळगाव मागतात, हवं तर पूर्ण कर्नाटक घ्या पण बेळगाव नको, असं वक्तव्य कोरेंनी केल्यानंतर पवारांनीही खास शैलीत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

NCP Chief Sharad Pawar On Maharashtra-Karnataka Border Dispute
NCP Chief Sharad Pawar On Maharashtra-Karnataka Border Dispute (HT_PRINT)

NCP Chief Sharad Pawar On Maharashtra-Karnataka Border Dispute : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात पेटलेल्या सीमावादावरून दोन्ही राज्यांचे सत्ताधारी एकमेकांसमोर आलेले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट कर्नाटकच्या डॉक्टरांसमोर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णालयाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी मूळ कर्नाटकचे असलेले रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे हे देखील उपस्थित होते. त्यावेळी भाषणात दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.

पिंपरी चिंचवडमध्ये हॉस्पिटलचं उद्घाटनसोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांशी बोलताना रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, शरद पवार मला नेहमी सांगत असतात की महाराष्ट्राला बेळगाव कधी देणार आहात?, त्यावेळी मी त्यांना नेहमी सांगत असतो की, घ्यायचं असेल तर संपूर्ण कर्नाटक घ्या पण बेळगाव नको, असं वक्तव्य कोरेंनी करताच सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. परंतु त्यानंतर भाषण करताना शरद पवारांनी सीमावादाचाच धागा पकडत कोरेंची चांगलीच कोंडी केली. कर्नाटक असो की महाराष्ट्र, कोरेंनी काही नवीन केलं की मला उद्घाटनाला बोलावतात. परंतु मी त्यांना काहीही मागत नाही. पण आता तेवढं बेळगाव महाराष्ट्राला देऊन टाका आणि विषय संपवा, अशी मिश्किल टिपण्णी शरद पवारांनी केल्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला दाद दिली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर कोनगोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत ४८ तासांत हिंसाचार थांबला नाही तर राष्ट्रवादीसहित इतर पक्षातील नेते बेळगावात जातील, असं वक्तव्य करत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट कर्नाटकातील डॉक्टरांसमोर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची मागणी केल्यामुळं त्यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

IPL_Entry_Point