रुग्णवाहिकेत डिझेल नाही... आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही, गलथान कारभारामुळे कोपरगावात गरोदर महिलेचा मृत्यू
pregnantwomen death : दवाखाना आहे तर डॉक्टर नाही,रुग्णवाहिका आहे तर डिझेल नाही. कोपरगाव तालुक्यातील आरोग्य केंद्राचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. या ढिसाळ कारभारामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर : राज्य सरकारने आरोग्य सेवा शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व सरकारी रुग्णालयातील उपचार मोफत केले आहेत. मात्र आरोग्य विभागाचे वास्तव खूपच वेगळे असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात व दुर्गम भागात अजूनही पायाभूत सुविधाही मिळालेल्या नाहीत. रस्ते, आरोग्य सुविधा, शैक्षणिक प्रश्न, पाणी या गरजाही भागलेल्या नाहीत. स्त्यांअभावी अनेक गर्भवतींना रुग्णालयात नेताना रस्त्यातच आपला जीव गमवावा लागला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, रुग्णवाहिका आहे तर डिझेल नाही. कोपरगाव तालुक्यातील आरोग्य केंद्राचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. नाशिक जिल्ह्यात एका गरोदर महिलेला रस्त्याअभावी झोळीतून रुग्णालयात पायपीट करत न्यावे लागत होते. सहा किलोमीटर पायपीट करत नेत असताना महिलेचा वाटेतच मृत्यू झाला तसेच बाळाचाही मृत्यू झाला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. अशाच प्रकारची आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना समोर आली आहे. ही घटना अहमदनगरमधील कोपरगावमधील आहे. काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातही रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता.
कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. चासनळी आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नव्हते. त्याचबरोबर प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दुसऱ्या रूग्णालयात नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेत डिझेलचीही वानवा होती. डिझेल नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका चालकाने गर्भवती महिलेस दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास नकार दिला.
आरोग्य व्यवस्थेच्या या गलथान कारभारामुळे महिलेला दुसरी गाडी शोधण्यात बराच वेळ गेला. यामुळेप्रसूतीसाठी आलेल्या २१ वर्षांच्या रेणूका गांगुर्डे या महिलेचा मृत्यू झाला.
ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी राज्य सरकारने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र कोपरगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने महिलेला आपला प्राण गमवावा लागला. रुग्णवाहिकेत डिझेल नव्हतं तर महिलेचा मृ्त्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह कोपरगावपर्यंत कसा नेला, असा प्रश्न मृत मुलीच्या आई-वडिलांनी उपस्थित केला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर आणि रुग्णवाहिका चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत मुलीच्या आई-वडिलांनी केली आहे.
विभाग