Aditya Thackeray : बीएमसीत सहा हजार कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Aditya Thackeray PC : खोके सरकारनं मुंबईला एटीएम समजून विकू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Aditya Thackeray On Shinde-Fadnavis Govt : मुंबई महापालिकेतील विकासकामांमध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांमध्ये सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळं आता यावरून शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी खोके सरकारनं टेंडर काढलेलं असतानाही त्याला कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं आता सरकारनं ते टेंडर रद्द करून नवं टेंडर काढलं आहे. शहरातील ४०० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ६०८० कोटी रुपयांचं टेंडर काढून त्याद्वारे कंत्राटदारांना तब्बल ४८ टक्के फायदा करून देण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिट रस्त्यांच्या कामांतील गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चौकशीची मागणी करत खोके सरकारनं एटीएम समजून मुंबईला विकू नये, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
ऑक्टोबर ते मे महिन्यात मुंबईतील रस्त्यांची कामं केली जातात. परिणामी पावसाळ्याआधीच सर्व रस्त्यांची कामं पूर्ण होतात. परंतु आता पावसाळ्यापूर्वी कामं होतील की नाही, याचा अभ्यास न करताच शिंदे-फडणवीस सरकारनं टेंडर कसं काय काढलं?, पालिकेत लोकनियुक्त बॉडी किंवा महापौर, नगरसेवक नसताना प्रशासकानं ही कामं कशी काय मंजूर केली?, गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री होते, त्यांनी त्यावेळी मुंबईतील रस्त्यांचं काम पूर्ण का केलं नाही?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं आहे.