मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  साखर खाणे अचानक पूर्ण बंद करताय? थांबा! होऊ शकतात हे दुष्परिणाम

साखर खाणे अचानक पूर्ण बंद करताय? थांबा! होऊ शकतात हे दुष्परिणाम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 18, 2023 10:03 PM IST

Health Care Tips: साखर खाण्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतो हे आपल्याला माहित आहे. पण ते खाणे अचानकपणे बंद केल्याने देखील आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

साखर खाणे पूर्ण बंद केल्यास होणारे दुष्परिणाम
साखर खाणे पूर्ण बंद केल्यास होणारे दुष्परिणाम (unsplash)

Side Effects of Stopping Sugar Consumption Completely: साखर खाण्याचे बरेच नुकसान आहेत. लठ्ठपणासोबत बरेच आजार होण्याचे कारण देखील साखर असते. साखरेच्या नुकसानापासून वाचण्यासाठी साखर खाणं सोडून देणे हा चांगला पर्याय आहे. पण जर तुम्ही अचानक साखर खाणे बंद केले तर तुम्हाला काही दुष्परिणाम देखील दिसून येतील. हे टाळण्यासाठी साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या सकाळच्या चहामध्ये २ चमचे साखर घेत असाल, तर आधी ते एक आणि नंतर अर्धा करा आणि नंतर हळू हळू सोडा, असे मीरारोड येथील वॉक्हार्ट रुग्णालयातील मधुमेह तज्ज्ञ डॉ. अनिकेत मुळे यांनी सांगितले.

अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं समोर आलं होतं, की साधारणपणे एक व्यक्ती वर्षाला २८ किलो साखर फस्त करते. एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर खाणं हे शरीरासाठी नक्कीच घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या निर्देशांनुसार, एका व्यक्तीने दिवसाला जास्तीत जास्त पाच ते सहा चमचे, किंवा २५ ते ३० ग्रॅम साखर खायला हवी. (How much sugar you should eat) याहून अधिक साखर खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तर दुसरीकडे अमेरिकन हार्ट असोसिएशनने (American Heart Association) म्हटलं आहे, की पुरुषांनी एका दिवसात साधारणपणे १५० कॅलरीज आणि महिलांनी १०० कॅलरीपर्यंत साखरेचं सेवन करावं. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी साखर खावी असं या संस्थेचं म्हणणं आहे.

परंतु आपण फळे, धान्ये इत्यादी गोड गोष्टी खाणे चालू ठेवले पाहिजे. जर तुम्ही गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले तर ते तुमच्या शरीरासाठी ते घातक ठरू शकते. गोड पदार्थ खाणे पूर्णपणे सोडून दिल्यानंतर, तुमचे शरीर चरबीपासून ग्लुकोज बनवण्यासाठी केटोन्स तयार करण्यास सुरुवात करते आणि हे केटोन्स शरीरात साठवलेल्या चरबीचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे तुमची चरबी वितळण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला केटोसिस म्हणतात. अशा प्रकारे वजन कमी करणे हानिकारक आहे कारण केटोन्समुळे तुमचे स्नायू दुखू लागतात. ज्याचा खूप वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. अचानक साखर बंद केल्यास तुम्हाला दुष्परिणाम दिसून येतील.

झोपेची समस्या

झोपेची पद्धत आपल्या संज्ञानात्मक आरोग्यावर अवलंबून असते जी थेट शरीरातील ग्लुकोज पातळीशी संबंधित असते. अमेरिकन जर्नल ऑफ लाइफस्टाइल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक शुगर डिटॉक्स आहार घेतात, त्यांच्यामध्ये ग्लुकोजची कमतरता असते आणि त्यांच्या झोपेच्या पद्धतीमध्ये अनेकदा बदल होतात. साखर ही चरबी असते, जी आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या मॅक्रोन्यूट्रिएंट्सपैकी एक मानली जाते. साखरेच्या कमतरतेमुळे अनेकदा असंतुलन निर्माण होते, ज्यामुळे अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे आणि बरेच काही होते.

थकवा जाणवणे

साखर हा ग्लुकोजचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. ग्लुकोज आपल्याला शरीराला उर्जा प्रदान करते. उर्जेसह इंधन भरण्यास मदत करते. साखर सोडल्याने शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होतो. यामुळे अनेकदा लोकांना थकवा जाणवतो आणि कामासाठी ऊर्जा कमी होते.

तणाव

शुगर डिटॉक्स हे नैराश्य आणि चिंतेचे कारण देखील ठरु शकते. गोड पदार्थांचे सेवन केल्याने डोपामाइन नावाचे रसायन मेंदूमध्ये बाहेर पडते. डोपामाइनमुळे आपला मूड चांगला असतो. शुगर डिटॉक्स केल्याचा परिणाम व्यवहारात दिसून येतो. व्यक्ती चिडचिडी देखील होऊ शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग