TDM:'मराठी सिनेमा संपवला जातोय', सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्यामुळे दिग्दर्शक संतापला
प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतरही चित्रपटगृहात 'टीडीएम' सिनेमाला शो नसल्या प्रकरणी बोलताना कलाकार, दिग्दर्शकांना अश्रू अनावर
'महाराष्ट्र दिना'च्या निमित्ताने सगळेच जण मराठी भाषेचा, महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगून हा दिवस साजरा करण्यात मग्न होते. मात्र या दिनी मराठी माणसाची होणारी गळचेपी ही उघडकीस आल्याने कुठेतरी या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याला आपणच गालबोट लावलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळणे हा मुद्दा काही जुना नाही. बरेचदा या विषयावर कलाकार मंडळींनी आवाज उठवलाय पण अद्याप यावर तोडगा काही निघाला नाही.
ट्रेंडिंग न्यूज
लोकांना चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघायचा आहे, त्या चित्रपटाला पाहून न्याय द्यायचा आहे असं लोकांच स्पष्ट म्हणणं असताना चित्रपटगृहात शो नसल्या कारणास्तव होणारी तारांबळ 'टीडीएम' हा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या लोकांच्याच तोंडून समोर आली आहे. २८ एप्रिलला टीडीएम हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
वाचा: थिएटर मिळत नसल्यानं TDM च्या अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी, Video Viral
याबाबत कलावंताआधीच नागरिकांनी पुढाकार घेऊन शो का नाहीत अशी विचारणा केली. या संपूर्ण चित्रावर भाष्य करत 'ख्वाडा', 'बबन' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर 'टीडीएम' हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस घेऊन येणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झालेत.
याविषयी बोलताना भाऊराव थोडं स्पष्टच म्हणाले की, 'आज 'टीडीएम' चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र चित्रपटगृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. आम्ही असं म्हणत नाही आमचा सिनेमा चांगला आहे, पण सिनेमाला प्रेक्षक प्रतिसाद देत असताना शो रद्द करणं हे कितपत योग्य आहे. परवा पासून पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात एक शो होता, काल दोन शो होते चित्रपट गृह तुडुंब भरलेले असताना ही वाढवून शो दिलाच नाही.'
पुढे ते म्हणाले की, 'लोकांना चित्रपट पाहायचाय त्यांची मागणी आहे, म्हणून मी स्वतः थेटर मालकांजवळ विचारपूस केली तर त्याच असं म्हणणं आहे की एकच शो लावा असा वरून प्रेशर आहे. माझ्या चित्रपटाला जे शो मिळाले आहेत ते पण प्राईम टाईम मधील नसून ऑड टाईममधील आहेत, आणि ऑड टाईम असल्यामुळे प्रेक्षकांना त्या वेळेत तिथवर पोहोचणं शक्य नाही आहे आणि हे सर्व पाहून आम्हाला खूप त्रास होतोय. माझा चित्रपट नसेल आवडला तर स्पष्ट मला लोकांनी सांगावं की, तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस त्या दिवशी मी सिनेमा निर्मितीच काम बंद करेन'. असं म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले.
विभाग