Suniel Shetty: तुम्ही पुढाकार घेतला तर बॉयकॉट हॅशटॅग बंद होऊ शकतो; सुनील शेट्टीचं ‘या’ व्यक्तीला साकडं!
Suniel Shetty on Boycott Bollywood: बॉलिवूडवर लागलेला हा बॉयकॉट कलंक दूर करणे आवश्यक आहे. हा कलंक खूपच वाईट आहे, हे बोलताना सुनील शेट्टी भावूक झाला होता.
Suniel Shetty on Boycott Bollywood: मुंबईच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये बनत असलेल्या फिल्म सिटीसंदर्भात बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी अभिनेता सुनील शेट्टी, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, सोनू निगम आणि बोनी कपूर यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. नोएडामध्ये बनत असलेल्या फिल्मसिटीसंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी काही कलाकारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अभिनेता सुनील शेट्टीने सोशल मीडियावर सुरू असलेला ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा हॅशटॅग रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या बैठकीतील अभिनेता सुनील शेट्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी सुनील शेट्टीच्या मागणीचे कौतुक केले आहे. या बैठकीत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, ‘सध्या सोशल मीडियावर सतत बॉयकॉट बॉलिवूड हा हॅशटॅग चालवला जातो. यामुळे चित्रपटांना मोठं नुकसान होतं. तुमच्या पुढाकाराने हा ट्रेंड थांबू शकतो. आम्ही दिवसभर ड्रग्ज घेत नाही, दिवसभर वाईट काम करत नाही. चांगल्या कामांमध्ये नेहमीच सक्रिय असतो. चित्रपटांच्या कथांवर लक्ष केंद्रित करून इतर गोष्टी टाळायला हव्यात. आमची ही मागणी तुम्ही पंतप्रधानांपर्यंत देखील पोहोचवा.’
सुनील शेट्टीच्या या वक्तव्यांचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. सुनील शेट्टी पुढे म्हणाले की, प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये खेचून आणणे खूप महत्त्वाचे आहे. #BoycottBollywood हा जो हॅशटॅग सुरू आहे, तो तुमच्या पुढाकारानेच थांबू शकतो. एक व्यक्ती वाईट असेल, म्हणून तुम्ही उरलेल्या सगळ्या लोकांची गणना त्यात करू शकत नाही. सध्या प्रेक्षकांच्या मनात हिंदी चित्रपटसृष्टीला काही चांगलं स्थान नाही. पण, आम्ही चांगले चित्रपटही केले आहेत. मी स्वतः बॉर्डरसारख चित्रपट केला आहे. अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये होते. पण, आता सुरू झालेला हा ट्रेंड चित्रपटांसाठी मारक ठरत आहे.’
अभिनेता सुनील शेट्टी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना म्हणाला की, तुम्ही पुढाकार घेतलात तर नक्कीच या गोष्टी बंद होऊ शकतात. बॉलिवूडवर लागलेला हा कलंक दूर करणे आवश्यक आहे. हा कलंक खूपच वाईट आहे, हे बोलताना सुनील शेट्टी भावूक झाला होता.