Nava Gadi Nava Rajya: आनंदी वर्षाचं सत्य राघव समोर आणू शकेल? ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये मोठा ट्वीस्ट
Nava Gadi Nava Rajya: एखादा कौटुंबिक नाजूक विषय इतक्या छान पद्धतीने कसा हाताळला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण या मालिकेतून पाहायला मिळत आहे.
Nava Gadi Nava Rajya: छोट्या पडद्यावरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतं आहे. या घरातील कर्णिक कुटुंब अर्थात आनंदी, राघव, रमा, चिंगी ही पात्र अगदी प्रेक्षकांना घरातल्यासारखीच वाटू लागली आहेत. एखादा कौटुंबिक नाजूक विषय इतक्या छान पद्धतीने कसा हाताळला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण या मालिकेतून पाहायला मिळत आहे. एका पत्नीच्या निधनानंतर लहान मुलीसाठी करावं लागलेलं दुसरं लग्न आता प्रेमात रुपांतरीत होत आहे. आनंदी आणि राघवच्या नात्याला आता एक वेगळी दिशा मिळत आहे. मात्र, यातच आता कर्णिक कुटुंबासमोर एक आव्हानं उभं राहिलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कर्णिकांच्या घरी रोज सकाळी येणारी राघवची बहीण वर्षा काही दिवस घरी न आल्यामुळे आनंदी चिंतेत आहे. वर्षाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय याची आनंदीला कुणकुण लागलेय. म्हणून आनंदी, रमाच्या मदतीने समजून घेण्यासाठी पहिल्यांदाच वर्षाच्या घरी जाते आणि तिथे वर्षाला न भेटता तिच्या नवऱ्यासोबत तिची भेट होते. या भेटीनंतर वर्षाच्या आयुष्यात नक्की काहीतरी गडबड आहे, हे आनंदीला कळतं.
वर्षा घरात असताना देखील तिचा पती ती बाहेर गेली आहे, असं खोटं सांगतो. यावेळी भोळी आनंदी त्यावर विश्वास ठेवते. मात्र, रमा आधीच घरात जाऊन सत्य काय याचा छडा लावून आलेली असते. रमा आनंदीला सगळ्या गोष्टी खऱ्या सांगते. यानंतर आनंदीलाही मोठा धक्का बसतो.
आनंदी ही गोष्ट घरात सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते पण कोणीच तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. एकीकडे आनंदीमुळे राघवच्या आयुष्यात नवे रंग भरले जात असताना वर्षाचं सत्य घरातल्यांसमोर येईल? सत्य समोर आल्यानंतर आनंदीची भावनिक साद आणि रमाची सुपर पावर वर्षाला तिच्या जाचातून मुक्त करतील? हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे. लग्नानंतर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासारखा अवघड विषय ही मालिका कश्या पद्धतीने हाताळतेय, हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.