BJP ला ४०० पार जागा मिळवायच्या असतील तर पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांगलादेशातही लढावं लागेल; रेवंत रेड्डी यांचा टोला
Lok Sabha Election : भाजपाला जर ४०० हून अधिक जागा मिळवायच्या असतील तर शेजारच्या बांगलादेश,अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही त्यांना निवडणूक लढवावी लागेल,असा टोला रेवंत रेड्डी (revanthreddy) यांनी लगावला.
Lok sabha election 2024 : भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळविण्याचा चंग बांधला आहे. भाजपने यावेळी ‘अब की बार ४०० पार’, असा नारा दिला आहे. मात्र या घोषणेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी यांनी टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रेवंत रेड्डी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला जर ४०० हून अधिक जागा मिळवायच्या असतील तर शेजारच्या बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही त्यांना निवडणूक लढवावी लागेल, असा टोला रेवंत रेड्डी (revanth reddy) यांनी लगावला.
ट्रेंडिंग न्यूज
रेवंत रेड्डी यांनी म्हटले की, दक्षिण भारतातील राज्यात लोकसभेच्या १३० जागा आहेत. त्यापैकी भाजपला १५ हून कमी जागांवर विजय मिळेल. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस व सहयोगी पक्षांनी राज्यात चांगले प्रदर्शन केले होते. भाजपचे केरळमध्ये खूपच खराब प्रदर्शन होते. आताही डावी आघाडी व काँग्रेसमध्येच सामना होत आहे. तेलंगाणाबाबत रेड्डींनी म्हटले की, इंडिया आघाडी राज्यातील १७ पैकी १४ जागांवर विजय मिळवेल. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस आणि भाजपावर मात करत ११९ जागांपैकी ६४ जागांवर विजय मिळवला होता. बीआरएसला केवळ ३९ जागा मिळाल्या होत्या.
इंडिया आघाडी दक्षिणेत १२५ जागा जिंकणार -
तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दावा केला की, इंडिया आघाडी दक्षिण भारतात एकूण १३० जागांपैकी ११५ ते १२० जागांवर विजयी होईल. संपूर्ण दक्षिण भारतात भाजपला अधिकाधिक १२-१५ जागा मिळतील. अन्य सर्व जागा इंडिया आघाडीच्या खात्यात जातील. तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटले की, केरळमधील सर्व २० जागांवर इंडिया आघाडीचा विजय होईल. केरळमध्ये भाजप आपले डिपॉझिटही वाचवू शकणार नाही.
भाजप व एनडीएच्या ४०० पार नाऱ्यावर रेवंत रेड्डी म्हणाले की, हे अशाच प्रकारचे कॅम्पेन आहे, जसे विधानसभा निवडणुकीत केसीआर यांनी केले होते. त्यांनी विधानसभेच्या १०० जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र मिळाल्या केवळ ३९ जागा. तशाच प्रकारचा दावा आता भाजप करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. मात्र मदतार यावेळी भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.