शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरेंची टीका, म्हणाले…
Jun 24, 2022, 05:18 PM IST
- उद्धव ठाकरे यांनी बंडात सामिल झालेल्यांपैकी दोन आमदारांची थेट नाव घेतले. एकनाथ शिंदे आणि संजय राठोड या दोन आमदारांवर नाव घेऊन टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी बंडात सामिल झालेल्यांपैकी दोन आमदारांची थेट नाव घेतले. एकनाथ शिंदे आणि संजय राठोड या दोन आमदारांवर नाव घेऊन टीका केली.
- उद्धव ठाकरे यांनी बंडात सामिल झालेल्यांपैकी दोन आमदारांची थेट नाव घेतले. एकनाथ शिंदे आणि संजय राठोड या दोन आमदारांवर नाव घेऊन टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. मुख्यमंत्रीपद हे आपल्यासाठी गौण असून सध्याच्या राजकीय उलथापालथीचा काहीही परिणाम होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘ठाकरे’ आणि ‘शिवसेना’ हे दोन शब्द न वापरता जगून दाखवण्याचं आवाहन त्यांनी शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांना केलं. या संबोधनात उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या दोन आमदारांची थेट नाव घेतले.
एकनाथ शिंदे आणि संजय राठोड या दोन आमदारांवर नाव घेऊन टीका केली. संजय राठोड हे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री आणि आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. २०२१ मध्ये पुण्यात एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात संजय राठोड यांचे नाव आले होते. याविरुद्ध भाजपने त्यावेळी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजप प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुण्यातील वानवडी भागात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद आहे असा आरोप करून संजय राठोड ह्या खुन्याला पोलीस वाचवताहेत, असा थेट आरोप त्यावेळी भाजपच्या चित्रा वाघ यांनी पत्रकारपरिषदेत केला होता. दरम्यान या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदासाठी प्रयत्नशील होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही संजय राठोड हे मुंबईतच होते. शिंदे यांच्या वतीने मुंबईतील शिवसेना नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बंडखोर गटाने त्यांना मुंबईतच ठेवले होते. आता वाटाघाटीचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर राठोड गुरूवारी गुवाहाटीत दाखल झाले.
संजय राठोड हे बंडखोरांच्या गटात सामिल झाल्याने मुख्यमंत्री खूपच नाराज झालेले दिसतात. आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा उल्लेख केला. ‘संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही त्यांना मी सांभाळलं’, असं मुख्यमंत्री म्हणाले. संजय राठोड यांच्या कठीण प्रसंगात साथ दिली होती. त्यामुळे आता उदभवलेल्या कठीण प्रसंगात राठोड यांनी बंडखोरांना साथ द्यायला नको होती, असा सूर मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला आहे.