कॅप्टन नसला तरी अंदाज तोच, विराटने भरला टीम इंडियात जोश
टीम इंडिया (team india) एक टेस्ट मॅच, तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी कसून सरावाला देखिल सुरुवात केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी (india vs england) भारताने जोरदार तयारी सुरू केली आहे. १ जुलैपासून एजबॅस्टन येथे हा सामना खेळवला जाणार आहे. याआधी टीम इंडिया (team india) लीसेस्टरमध्ये काउंटी टीम लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसांचा सराव सामनाही खेळणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत.
बीसीसीआयने या सरावाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकंच नाही तर लीसेस्टरशायर फॉक्सने टीम इंडियाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली टीमसोबत त्याचा अनुभव शेअर करत आहे. तसचे, खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसून येत आहे. सराव सामना अपटॉनस्टील काऊंटी मैदानावर खेळवला जाईल. विराटला इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर यावर्षीच विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. विराट आज जरी टीम इंडियाचा कॅप्टन नसला तरी त्याचा अंदाज तोच आहे, त्याने त्याची आक्रमक शैली विसरलेली नाही. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीने भारताच्या युवा खेळाडूंचा उत्साह वाढवला. लीसेस्टरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "गेम मोड अॅक्टिव्हेटेड, विराटने क्षमतावान खेळाडूंचा जोश वाढवला".
भारतीय संघ १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना गेल्या वर्षी झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेचा भाग आहे. २०२१ मध्ये फक्त चार कसोटी सामने खेळले गेले होते. कोरोनामुळे एक सामना होऊ शकला नाही. टीम इंडिया या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.
तसेच, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही हा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. टीम इंडियाला जर स्पर्धेतील अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे. भारत या सामन्या पराभूत झाला तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर घसरू शकतो.
दरम्यान, यापूर्वी जेव्हा भारतीय संघ इंग्लंडला गेला होता तेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार होता. यामुळेच कोहलीला युवा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यास सांगण्यात आले होते. कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया तीन सामन्यांची टी-२० आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे.