IND vs ENG: रोहित-धवनची शतकी भागीदारी, बुमराहची घातक गोलंदाजी; भारताचा मोठा विजय
या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना १४ जुलै रोजी होणार आहे.
टीम इंडियाने पहिला वनडे सामना १० विकेट्सनी जिंकला आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंडने दिलेले १११ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ७६ आणि शिखर धवनने ३१ धावा केल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना १४ जुलै रोजी होणार आहे.
दरम्यान, रोहितने त्याच्या खेळीत ५८ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ५ सणसणीत चौकार लगावले. त्याने नाबाद ७६ धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर शिखर धवननेही ३१ धावांचे योगदान दिले. त्याने ५४ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार लगावले.
तत्पूर्वी, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवताना भारताच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ २५.२ षटकातच ११० धावांवर गारद झाला.
भारताकडून बुमराहने सर्वाधिक ६ तर शमीने ३ विकेट्स घेतले. तर इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार ठोकले. त्याच्याशिवाय डेव्हिड विलीने २१ आणि कार्सने १५ धावांचे योगदान दिले.