Rohit Sharma: रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह! क्रिकेट चाहत्यांनी सांगितल्या 'या' ५ चुका
Rohit Sharma: captaincy asia cup 2022: टीम इंडियाला आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून सलग सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते संतापले आहे. चाहत्यांनी रोहित शर्माच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
टीम इंडियाचा आशिया कप २०२२ मधील प्रवास जवळपास संपला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला फायनल गाठणे फार कठीण झाले आहे. यासाठी टीम इंडियाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ शेवटच्या षटकात पराभूत झाला.
यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. आशिया चषकात काही निर्णय असे घेण्यात आले की, ते चाहत्यांच्या आकलनाहेरचे आहेत. त्यामुळे आता चाहते रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागले आहेत.
फिनीशर म्हणून कार्तिकऐवजी पंतला संधी
दिनेश कार्तिक आशिया चषक स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळला पण त्याला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. टीम इंडियाने सुपर फोरमध्ये दिनेश कार्तिकपेक्षा ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली. पाकिस्तानविरुद्ध बेजबाबदार शॉट खेळून पंत बाद झाला. त्याला १२ चेंडूत केवळ १४ धावा करता आल्या. यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. मात्र १३ चेंडूत १७ धावा करून तो बाद झाला. यानंतर कार्तिकसारखा फिनीशर सोडून पंतला संंधी देणे, याचे लॉजिक काय? असा प्रश्न चाहते कर्णधार रोहित शर्माला विचारत आहेत.
फलंदाजीचे क्रम अजूनही ठरलेले नाहीत
T20 वर्ल्ड 2022 साठी आता फारच कमी वेळ शिल्लक आहे. मात्र, कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर खेळणार हे अद्यापही संघ व्यवस्थापनाने ठरवलेले नाही. श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ५व्या क्रमांकावर कोण उतरणार हे आधी ठरलेले नव्हते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोहित बाद झाला तेव्हा हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत दोघेही मैदानात उतरण्यासाठी तयार होते. मात्र संघ व्यवस्थापनाने अखेर हार्दिकला मैदानात उतरण्याचा इशार केला.
संघात दीपक हुड्डाचा रोल काय?
दीपक हुडाला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात घेतले होते की अष्टपैलू म्हणून. सुपर फोरच्या दोन्ही सामन्यांमध्ये दीपक हुड्डाला खेळवण्यात आले. पण रोहित शर्माने दोन्ही सामन्यात एकदाही हुड्डाला गोलंदाजी दिली नाही. सोबतच हुडाला फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
पॉवरप्लेमध्ये अश्विनऐवजी चहल का?
रविचंद्रन अश्विनला पहिल्या तीन सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. त्याला श्रीलंकेविरुद्धच्या संधी मिळाली, पण युझवेंद्र चहलनंतर त्याला गोलंदाजी करण्यासाठी आणण्यात आले. अश्विन पॉवरप्लेमधील गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, पहिल्या ६ षटकांत चौथा गोलंदाज म्हणून रोहितने चहलवर विश्वास व्यक्त केला. चहलने पॉवरप्लेचे सहावे षटक टाकले आणि १२ धावा दिल्या.
प्लेईंग इलेव्हनमध्ये सतत बदल कशामुळे?
टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये सतत होणारे बदल देखील चाहत्यांच्या आकलनापलीकडचे आहेत. रवी बिश्नोईने पाकिस्तानविरुद्ध ४ षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली. त्याने बाबर आझमची महत्त्वाची विकेट घेतली. पण श्रीलंकेविरुद्ध त्याला वगळण्यात आले. बिश्नोई यंदा टी-20मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
रोहित शर्मा बेजबाबदार कॅप्टन
अर्शदीप सिंग शेवटच्या षटकात कर्णधार रोहित शर्माला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण रोहितने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. रोहित शर्माची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर काही चाहते त्याच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.