मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  S Somanath : इस्रोचे प्रमुख म्हणतात, विज्ञानाचा जन्म वेदांमधून झाला, पण पाश्चात्यांनी स्वत:च्या नावावर खपवला

S Somanath : इस्रोचे प्रमुख म्हणतात, विज्ञानाचा जन्म वेदांमधून झाला, पण पाश्चात्यांनी स्वत:च्या नावावर खपवला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 25, 2023 10:48 AM IST

S Somanath on Science : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी विज्ञानाच्या उत्पत्तीविषयी मोठा दावा केला आहे.

S Somanath
S Somanath

S Somanath : 'भारतीय संस्कृतीतील वेद हेच विज्ञानाचं मूळ आहे. मात्र, अरबस्तानातून हे ज्ञान पाश्चात्त्य देशांमध्ये गेले आणि त्यांनी स्वत:च्या नावावर खपवले, असा दावा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी केला आहे.

उज्जैन येथील महर्षी पाणिनी संस्कृत आणि वेद विद्यापीठात ते बोलत होते. एस. सोमनाथ यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना भाषेच्या अडचणीचा दाखला दिला. वेदांचं ज्ञान संस्कृत भाषेत होतं. ही भाषा त्या काळी लिहिली जात नव्हती. लोक एकमेकांकडून मौखिक माहिती किंवा ज्ञान घ्यायचे आणि ते लक्षात ठेवायचे. त्यामुळं त्याचा योग्य प्रसार होऊ शकला नाही. कालांतरानं हे सगळं देवनागरी लिपीत लिहिलं गेलं, असं ते म्हणाले. 'बीजगणित, वर्गमूळ, कालगणना, स्थापत्यशास्त्र, विश्वाचा आकार, धातूविज्ञान आणि विमान उड्डाण ही सगळी माहिती सर्वात आधी वेदांमध्ये होती, असं ते म्हणाले.

Monsoon Update : मॉन्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण; भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची अपडेट

'इंजिनीअर आणि शास्त्रज्ञांना संस्कृत भाषा खूप आवडते. ही भाषा संगणकासाठी अतिशय सोपी आहे आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सची यंत्रणा देखील ही भाषा सहज वाचू शकते. संस्कृतचा वापर गणनेत कसा करता येईल यावर बरेच संशोधन चालू आहे. भारतात संस्कृतमध्ये निर्माण झालेलं साहित्य हे केवळ साहित्यिक दृष्टिकोनातूनच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे. संस्कृतमधील सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक अभ्यासात फरक नाही, असंही त्यांनी सांगितलं.

'भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांचं संशोधन प्राचीन काळापासून संस्कृतमध्ये लिहिलं, परंतु नंतर त्यावर फारसं संशोधन झालं नाही. आठव्या शतकात लिहिलेले सूर्यसिद्धांत हे याचं उदाहरण आहे. या पुस्तकात पृथ्वीचा परीघ, सूर्यमाला आणि अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. हे सगळं पाश्चिमात्य जगानं सांगितलं आणि त्याचं श्रेय देखील लाटलं, असं ते म्हणाले.

Facebook Layoffs: फेसबुकनं १० हजार कर्मचाऱ्यांना काढलं; ई-मेल करून नोकरी गेल्याचं सांगितलं!

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो सध्या अनेक मोठ्या मोहिमांवर काम करत आहे. यात चांद्रयान-३ मिशन आणि आदित्य-१ मिशनचा समावेश आहे.

IPL_Entry_Point