Sharad Pawar : महाराजांनी शिकवलंय, दिल्लीसमोर झुकणार नाही; शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
NCP Convention In Delhi : महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
sharad pawar on modi govt : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत माजी मंत्री आणि खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, शेतकरी हा देशाचा गौरव आहे. देशातील ५६ टक्के लोकसंख्या शेतीक्षेत्रावर अवलंबून आहे. परंतु देशात सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या विचारांतून आपल्याला प्रेरणा मिळते, त्यामुळं आपण कधीही दिल्लीसमोर झुकणार नसल्याचं सांगत शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना महिलांचा आदर करण्याचं आवाहन देशवासियांना केलं. परंतु त्याच दिवशी बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींची त्यांचंच गृहराज्य असलेल्या गुजरात सरकारनं सुटका केली. जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाल्याचं भाजप नेते सांगत असतात, इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेशी आपल्या अर्थव्यवस्थेची तुलना करतात. परंतु भारताचे दरडोई उत्पन्न इंग्लंडच्या तुलनेत फार कमी असल्याचं सांगत शरद पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
जनतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल- पवार
मोदी सरकारच्या काळात तीन कृषी कायदे कोणतीही चर्चा न करता पास करण्यात आले. अल्पसंख्यांक समाजाबद्दल द्वेषाचं आणि विरोधाचं वातावरण तयार केलं जातंय, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जनतेच्या पाठिशी उभा राहणारा पक्ष आहे. जनतेच्या प्रश्नांवर आम्ही रस्त्यावर उतरू, असं पवार म्हणाले.