नवाम राबिया प्रकरण योग्य की अयोग्य हे राजकीय स्थितीवर ठरेल; सरन्यायाधीशांची सूचक टिप्पणी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या यांचिकांवर नवाम राबिया प्रकरण कसं लागू होईल का, यावर युक्तिवाद करा, असं सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाच्या सांगितलं आहे.
Supreme Court Hearing On Maharashtra Political Update Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या याचिकांवर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. काल सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केले होते. त्यानंतर आज शिंदे गटाकडून जेष्ठ विधिज्ञ हरिश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू मांडली आहे. परंतु आता शिंदे गटाचे वकील सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सत्तासंघर्षाच्या प्रकरणांवर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करायला सुरू केल्यानंतर सरन्यायाधीशांनी वकिलांना मध्येच थांबवत म्हणाले की, अरुणाचल प्रदेशातील नवाम राबिया प्रकरण हे योग्य आहे की अयोग्य?, ते राजकीय स्थिती काय आहे, यावर ठरणार आहे. त्यामुळं ते महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कसं लागू होईल, यावर तुम्ही युक्तिवाद करा, असं म्हणत सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांना खडसावलं आहे. खंडपीठातील इतर चार न्यायाधीशांशी १० मिनिटं चर्चा केल्यानंतर सरन्यायाधीस डीवाय चंद्रचूड म्हणाले की, कोर्टानं बहुमत चाचणी थांबवण्यास नकार दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन मार्ग होते, परंतु त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असंही सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.
शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी...
शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करताना म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्षांना ज्या मेलवरून २२ जुनला अविश्वासाचा प्रस्ताव पाठवण्यात आला तो मेल जरी अनोळखी असला तरी प्रस्तावावर अनेक आमदारांच्या सह्या होत्या, असा दावा कौल यांनी केल्यानंतर त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेत इमेल २४ जुनला विधानसभा उपाध्यक्षांना मिळाल्याचं सांगत अनोळखी मेलची विश्वासार्हता काय आहे?, असा सवाल केला. त्यावर संतापलेल्या कौल यांनी 'मी तुमचा युक्तिवाद सुरू असताना बोललो का?, माझा युक्तिवाद सुरू असताना मध्येच बोलू नका', असं म्हणत सिब्बलांना फटकारलं.