Saamana Editorial: फडणवीसांना अटकेची भीती का? 'सामना' अग्रलेखातून शिवसेनेचा हल्लाबोल
Devendra Fadnavis's Allegation: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांवर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.
Shiv Sena criticizes Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (८ फेब्रुवारी २०२३) विधानसभेत महाविकास आघाडीने मला अटक करण्यासाठी डाव रचण्यात आला होता. माझ्या अटकेची सुपारी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती, असा आरोप केला होता. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. फडणवीसांच्या या आरोपावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आज तिखट सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
"देवेद्र फडणवीस हे वारवार सांगत असतात की, महाविकास आघाडी सरकार त्यांना अटक करणार होते व मुख्यमंत्री ठाकरे यांची त्या कारवाईस मूक संमती होती. मंगळवारीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी तीच रेकॉर्ड पुन्हा वाजवली. फडणवीस हे गेल्या काही दिवसापासून धादांत खोटे बोलू लागले आहेत व हे काही संघ संस्कारांस शोभणारे नाही. फडणवीस हे राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते, माजी मुख्यमंत्री होते. १०५ आमदारांचे नेतृत्व ते करीत होते. अशा नेत्याच्या मनात "मला अटक केली जाईल" अशी भीती का असावी? 'खाई त्याला खच्खते' किंवा 'चोराच्या मनात चांदणे' या दोन म्हणी मराठीत अशा प्रसंगाला साजेशा आहेत", अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले.
त्याचबरोबर कोणत्या प्रकरणात फडणवीस यांना अटक केली जाणार होती व त्या प्रकरणाचे पुढे काय झाले? त्या प्रकरणाशी फडणवीस यांचा काही संबंध होता काय? याचा खुलासा फडणवीस यांनी केला असता तर संभ्रमाची जळमटे दूर झाली असती, असा सवालही सामना अग्रलेखातून फडणवीसांना विचारण्यात आला आहे.
"कशात काही नसताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख, पॅबिनेट मंत्री नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेकांना तुमच्याच केंद्रीय तपास यंत्रणांनी अटका केल्याच ना? फोन टॅपिंगचे प्रकरण गंभीर वाटत नसेल तर मग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी फोन टॅपिंगच्याच प्रकरणात अटक का केली? याचे उत्तरही लोकांना मिळायला हवे. तसेच रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले व हे कृत्य बेकायदेशीर होते. ज्यांचे फोन ‘टॅपिंग’ केले ते नेते विरोधीपक्षांचे होते. या नेत्यांच्या फोन क्रमांकासमोर दहशतवादी, गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची नावे लिहून हे सर्व लोक देशविरोधी कारस्थान करीत आहेत म्हणून गृहखात्याकडे फोन टॅपिंगचा प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेतला. हा गुन्हा आहे की नाही, याचा खुलासा फडणवीस यांनीच करावा", असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.