Uttar Pradesh : मुलायमसिंह यांना ‘पद्मभूषण’ दिल्यामुळं संघ परिवारात अस्वस्थता; काय आहे कारण?
Mulayam Singh Yadav : समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते मुलामसिंह यांना मोदी सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. त्यामुळं आता भाजपच्या समर्थकांसह संघ परिवारात नाराजी व्यक्त केली जात आहे.
Mulayam Singh Yadav Padma Bhushan : समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना केंद्रातील मोदी सरकारनं मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं होतं. मुलायमसिंह यांचं संसदीय राजकारणातील योगदान लक्षात घेऊन सरकारनं त्यांना पुरस्कार दिला आहे. परंतु आता यावरून नवा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. कारण मुलायमसिंह यांना मोदी सरकारनं पुरस्कार दिल्यामुळं भाजपच्या समर्थकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या समर्थकांनी मुलायम यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच सोशल मीडियावरून मोदी सरकावर टीका केली आहे.
मोदी सरकारच्या निर्णयावर संघातील नेते का आहेत नाराज?
समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १६ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय भाजपचं सरकार पडल्यानंतर १९९९ केंद्रात स्थापन झालेल्या सरकार स्थापनेतही मुलायमसिंह यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळं संपूर्ण कारकिर्दीत संघ आणि भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्याचा केंद्रातील मोदी सरकारनं मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केल्यामुळं भाजपच्या समर्थकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२०१४ साली भाजपनं केंद्रात बहुमतासह सत्ता स्थापन केल्यानंतर मुलायमसिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अतिशय मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले होते. मुलायमसिंह यादव यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे प्रमुख सैनिक', असा त्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळं आता मुलायमसिंह यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आल्यामुळं संघ आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.