सत्तांतरानंतर भाजपनं मातोश्रीवर का जाऊ दिलं नाही?, चंद्रकांत पाटलांनी सांगितली आतली गोष्ट
Chandrakant Patil : शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर भाजपच्या गोटात काय सुरू होतं, याचा खुलासा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
Chandrakant Patil On Uddhav Thackeray : भाजपनं २०१४ साली लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील युती तुटली. याशिवाय राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचीही आघाडी तुटल्यामुळं चारही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. परंतु आता शिवसेनेशी युती तुटल्यानंतर त्यावेळी भाजपच्या गोटात काय सुरू होतं, याचा खुलासा भाजप नेते आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळं आता त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१४ साली भाजपची शिवसेनेसोबत युती तुटली. परंतु भाजपचा मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिवसेना मंत्रिमंडळात यायला हवी, यासाठी मी आणि धर्मेंद्र प्रधान तब्बल ३० वेळा मातोश्रीवर गेलो होतो, असा गोप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला आहे. तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर आम्ही मातोश्रीवर तीन वेळा दीड-दीड तास गेलो होतो, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जो आदेश येईल त्यानुसार आम्ही काम केलं. आम्ही अनेकदा मातोश्रीवर गेलो होतो. परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपनं मातोश्रीवर जाण्याचा आदेश दिलेला नाही. त्यामुळं आता मला मातोश्रीवर प्रवेश आहे की नाही, याबाबत माहिती नसल्याचाही खुलासा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपनेच शिवसेना फोडल्याचा आरोप सातत्यानं ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. त्यामुळं आता शिवसेना-भाजपातील युती तुटल्यानंतर भाजपमध्ये नेमकं काय सुरू होतं, याचा खुलासा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.