Govandi Murder Case : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाच्या मानेत चाकू खुपसून हत्या, दोन आरोपींना अटक
Govandi Murder Case : काचेच्या बाटलीत फटाके फोडू नका, असं सांगितल्यानं तीन आरोपींनी एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Govandi Mumbai Crime News : राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात असतानाच फटाक्यांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. त्यामुळं ऐन दिवाळीतच मुंबईत खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबईतील गोवंडीत ही घटना घडली असून किरकोळ कारणामुळं तरुणाची हत्या करण्यात आल्यानं परिसरात दहशत पसरली आहे. सुनील शंकर नायडू असं मृत तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीत म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या सुनील यांच्या घरासमोर एक मुलगा फटाके फोडत होता. त्यावेळी त्यांनी त्या मुलाला काचेच्या बाटलीत फटाके फोडू नको, असं सांगितलं. त्यामुळं संतापलेला तरुण त्याच्या दोन मित्रांना घेऊन आला व मित्रांच्या साथीनं त्यानं सुनिल यांच्यावर हल्ला चढवला. एका आरोपीनं सुनीलच्या मानेत चाकू खुपसला. याशिवाय तिन्ही आरोपींनी सुनिलला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना ही घटना घडल्याचं लक्षात येताच त्यांनी जखमी सुनील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.
गोवंडीत तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून आणखी एकाचा शोध घेतला जात आहे. मात्र, ऐन दिवाळीतच मुंबईत फटाके वाजवल्याच्या कारणावरून हत्या झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.