Mumbai Fire : मुंबईत फटाक्यांमुळं अग्नितांडव; दिवाळीच्या दिवशी ‘या’ सहा ठिकाणी भीषण आगीच्या घटना
Mumbai Fire: दिवाळीच्या सणाच्या दिवशीच मुंबईत तब्बल सहा ते सात ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
fire incident in mumbai : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दिवाळीचा सण साजरा केला जात असतानाच आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं आता ऐन दिवाळीत लोकांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. काल दिवसभरात वसई, विरार, नालासोपारा आणि नायगांवमध्ये आग लागल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. फटाके वाजवल्यामुळं शहरातील पाच ठिकाणी आग लागली असून एका घरात एसी जळाल्यामुळं बंगल्याचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवानं या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
मुंबईत कोणत्या ठिकाणी लागली आग?
- मुंबईतील नवापूरमध्ये रॅकेटच्या ठिणगीमुळं एका नारळाच्या झाडाला आग लागल्याची घटना समोर आली होती. परंतु स्थानिक लोकांनी त्यावर पाणी टाकून तात्काळ आग नियंत्रणात आणली.
- वसई फाटा परिसरातील एका चप्पल गोदामाला भीषण आग लागली होती. त्यानंतर तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं. त्यासाठी अग्निशमन दलाचे सात बंब तैनात करण्यात आले होते.
- नायगांवमधील टिवरी परिसरात प्रिमायसेस टॉवरमधील एका घरात आग लागली होती. रॉकेट उडवल्यामुळंच ही घटना घडली होती. परंतु वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलानं तातडीनं आग विझवली.
- विरारमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमुळं गोपचर वाड्यात कापसाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय विरारमधील आणखी दोन ठिकाणी आग लागली. परंतु महापालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत तात्काळ आग विझवली.
-विरारच्या मोहक सिटीत बांबूच्या साठ्यात फटाक्याच्या रॉकेटची ठिणगी पडून आग लागली. ही घटना घडल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी तातडीनं अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.
- वसईतील अंबाडी रोडवरील सत्यम बंगल्यात एसीनं अचानक पेट घेतल्यानं संपूर्ण बंगल्यातील फर्निचर जळून खाक झालं आहे. ही घटना घडल्याचं समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं आग विझवली.