Ajit pawar : शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता?, अजित पवारांनी सांगितलं कारण
Ajit Pawar : अजित पवार म्हणाले की, शरदपवारांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला आहे. आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली आहे.
मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये २ मे रोजी शरद पवार यांची राजकीय आत्मकथा असलेल्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या सुधारित वृत्तीचे प्रकाशन झाले. मात्र या सोहळ्यासाठी जमलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का देत शरद पवारांनीअचानक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. शरद पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना धक्का बसला तसेच राज्याच्या राजकारणात खळबळ माजली.
कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीतील अनेक नेते उपस्थित होते मात्र अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता स्वत: अजित पवारांनी खुलासा केला असून पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहण्याचे कारण सांगितले आहे.
अजित पवार म्हणाले की, शरद पवारांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला आहे. आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली आहे. पाच मे रोजी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतआपण राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र माझ्या नियोजित कार्यक्रमामुळे या पत्रकार परिषदेला मला उपस्थित राहता आले नाही. त्याचबरोबर शरद पवारांनी आदेश दिल्यामुळेही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहता आले नाही,असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, शरद पवार बोलतील तीच पक्षाची भूमिका आहे. महाविकास आघाडी होती, आहे आणि भविष्यात राहील. महाआघाडीला कुठेही धक्का लागणार नाही. माझ्यावर अति प्रेम करणारे लोक संभ्रम निर्माण करत आहेत. काहींना माझं काम बघवत नाही, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी राज ठाकरेंवर टीका करताना पवार म्हणाले की, त्यांना मिमिक्री करण्याशिवाय काही काम राहिले नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे.