राजपथचं नाव बदलणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सांगावं; संजय राऊतांचं भाजपला आव्हान
Sanjay Raut PC : सध्या काँग्रेस सत्तेवर नाही म्हणून त्यांचा इतिहास पुसला जाईल, असं भाजपला वाटत असेल तर ते होणार नाही, असंही राऊत म्हणाले.
Sanjay Raut On BJP : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षानं दिलेलं योगदान हे एक सत्य आहे. त्याला कुणीही नाकारू शकत नाही. काँग्रेससोबत आमचेही मतभेद असू शकतात. परंतु महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मान्यच करावं लागेल, भाजपनं स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान दिलं आहे ते सांगावं, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोदी-शहांवर निशाणा साधला आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसनं महत्त्वाची भूमिका बजावली असून भाजपनं स्वातंत्र्यासाठी कोणतंही बलिदान दिलेलं नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं होतं. त्याचं संजय राऊतांनी समर्थन करत म्हटलं आहे की, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास पाहता काँग्रेसच्या बलिदानाकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्ही नवे दावे करू शकता, पुस्तकं बदलू शकता. दिल्ली शहराचं नाव सूरत, संसदभवन आणि राजपथचं नावं बदलली जाऊ शकतात, परंतु इतिहास बदलू शकत नाही, असं म्हणत राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
इंग्रजांच्या काळात आण त्यानंतरही देशातील जनतेला जागृत करण्याचं काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे. पक्ष सत्तेत नसल्यानं त्यांचा इतिहास पुसला जाईल, असं भाजपला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. ज्या लोकांना स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतल्याचा इतिहासच नाही, ते लोक इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे.