मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thackeray: उद्धव ठाकरे यांचा नड्डांना आवाज; म्हणाले, त्यांना माहीत नाही की…

Thackeray: उद्धव ठाकरे यांचा नड्डांना आवाज; म्हणाले, त्यांना माहीत नाही की…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 03, 2022 04:10 PM IST

Uddhav Thackeray attacks JP Nadda: शिवसेना संपत चालली आहे, असं म्हणणारे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार इशारा दिला आहे.

Uddhav Thackeray - J P Nadda
Uddhav Thackeray - J P Nadda

Uddhav Thackeray attacks JP Nadda: एकनाथ शिंदे गटाच्या आडून भारतीय जनता पक्षानं शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान रचल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्यानं केला जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांबद्दल केलेल्या विधानामुळं ते अधोरेखित झालं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नड्डा यांच्या या वक्तव्यावरून भाजपला जोरदार इशारा दिला आहे.

एकनाथ शिंंदे व ४० आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबवलं जात आहे. तसंच, शिवसैनिक शपथपत्र लिहून देत आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक आज अशी हजारो शपथपत्रं घेऊन ‘मातोश्री’ निवासस्थानी आले होते. उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांना संबोधित केलं. 

‘गेले महिनाभर मातोश्रीवर गर्दी आहे. खरंतर इथपर्यंत येण्याची गरज नाही. आपापल्या विभागात पाय रोवून सर्वांनी काम करावं, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 'शिवसेनेची लढाई ही दोन-तीन पातळ्यांवर सुरू आहे. एक लढाई रस्त्यावरची आहे. त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई न्यायालयात सुरू आहे. तिकडे आपले वकील किल्ला लढवताहेत. न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. तिसरी लढाई कागदी आहे. सदस्य नोंदणी आणि शपथपत्रांची आहे. हा विषय फार गंभीर आहे. तो सहजपणे घेऊ नका, असं आवाहन यावेळी उद्धव यांनी केलं. 

'आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. शिवसेनेत बंडाळी झाल्या. त्या बंडाळी आपण थंड केल्या. मात्र, आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न होत आहेत. हा धोका मी आधीच ओळखला होता आणि मी त्याबद्दल आधीही बोललो होतो. परवा भाजपच्या अध्यक्षांनी नेमकं तेच बोलून दाखवलं.  शिवसेना हा संपत चाललेला पक्ष असल्याचं ते म्हणाले. पण, त्यांना कल्पना नाही की शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवून त्यावर भगवा फडकवला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

‘राजकारणात हारजीत होत असते. पराभव होत असतो. पण इतर पक्षांना संपवण्याची भाषा कधी झाली नव्हती,’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

IPL_Entry_Point

विभाग