Employee Strike : कर्मचारी संघटनांच्या एकजुटीला मोठा हादरा; ठाणे मनपातील कर्मचाऱ्यांची संपातून माघार
Employee Strike Thane News : संपातून माघार घेतल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर परतल्यानं पालिकेतील कारभार सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे.
Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra : जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी कार्यालयं ओस पडली असून प्रशासकीय कामकाज खोळंबल्यानं सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच आता राज्यातील कर्मचारी संघटना एकजुटीनं पेन्शन योजनेसाठी संप करत असतानाच ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्यातील कर्मचारी संघटनांच्या एकीला ठाण्यातून मोठा हादरा बसल्याचं बोललं जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राज्यातील सरकारी आणि निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, परंतु ठाणे मनपातील कर्मचारी मात्र संपात सहभागी झाले नसल्याचं दिसून आलं आहे. संपात सहभागी होण्याऐवजी ठाणे मनपातील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना मागण्यांचं निवेदन दिलं, त्यानंतर अनेक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळं राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यालयं ओस पडलेली असतानाच ठाण्यातील मनपात कारभार सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे. तरीदेखील ठाणे मनपातील कोणकोणते कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, याची माहिती घेण्याचं काम ठाणे मनपा प्रशासाकडून सुरू असल्याची माहिती आहे.
कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे- काँग्रेस
अनेक लोक आयुष्यभर काम करत असतात, त्यामुळं त्यांना पेन्शन मिळायलाच हवी. शिंदे-फडणवीस सरकारनं कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या शेजारील तीन राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात येत असते. त्यामुळं राज्यातील कर्मचाऱ्यांनाही पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.