KCR : तेलंगणातील भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात एन्ट्री; केसीआर यांची नांदेडमध्ये जंगी सभा
Telangana CM KCR In Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षानं महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. केसीआर यांनी नांदेडमध्ये सभा घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Bharat Rashtra Samithi rally In Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षानं महाराष्ट्रातील नांदेडमध्ये जोरदार एन्ट्री केली आहे. माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. त्यामुळं एमआयएमनंतर तेलंगणाच्या आणखी एका पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळं त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. अनेक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी आलेत, परंतु अजूनही देशात लोकांना चांगलं पिण्याचं पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी नाही. गरिबांना वीज मिळत नाही. त्यामुळं आता देशात परिवर्तन करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री केसीआर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करतात, कारण शेतकऱ्यांच्या उन्नतीचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. परंतु नेते विधीमंडळात आणि संसदेत भाषण करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळं आता अबकी बार किसान सरकार स्थापन होणार असल्याचा दावाही केसीआर यांनी केला आहे. देशभरात तब्बल ४२ टक्के लोक शेतकरी आहेत. शेतमजुरांची संख्या जोडली तर आकडेवारी ५० टक्क्यांच्या आसपास जाते. त्यामुळं जातीधर्माच्या नावावर द्वेष न करता आपल्याला शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी एकत्र यावं लागणार आहे. भारत हा बुद्धीजिवींचा देश आहे, बुद्धू लोकांचा नाही, असं म्हणत केसीआर यांनी भाजपवर हल्लबोल केला आहे.