BS Koshyari : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवर स्थगिती कायम; सुप्रीम कोर्टाचा सरकारला दणका
Supreme Court : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या नियुक्तीवर स्थगिती कायम ठेवली आहे.
Supreme Court on Governor Bhagat Singh Koshyari : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कारण आता सुप्रीम कोर्टानं राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवर स्थगिती कायम ठेवली आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय कोर्टानं या प्रकरणात राज्य सरकारलाही बाजू मांडण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाची सुनावणी पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
विधानपरिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून २०२० मध्ये यादी सादर करण्यात आली होती. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळं याबाबत रतन सोली लुथ यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून आमदारांच्या नियुक्तीबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं यावरील स्थगिती कायम ठेवली आहे.
कोर्टात झालेल्या सुनावणीत पुढील आदेश येईपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय या प्रकरणाची सुनावणी येत्या १६ नोव्हेंबरला पुन्हा होणार आहे. याची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश केएम हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारला धक्का...
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सादर करण्यात आलेल्या आमदारांच्या यादींना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून राज्यपालांना नवीन यादी सादर करण्याची तयारी सुरू होती. परंतु आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवर स्थगिती कायम ठेवण्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिल्यानं शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.