Shivsena Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची पर्यायी जागा कोणती? अनिल परब म्हणाले..
मुंबई महापालिकेनेशिवसेना व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान नाकारले आहे. त्यानंतर शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यावर होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर शिवसेना नेते व माजी मंत्री अनिल परब(Anil Parab)यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून(Shivsena Dasara Melava)राज्यातील राजकारण तापलं आहे. कायदा व सुव्यवस्थेचा दाखला देत मुंबई महापालिकेनेशिवसेना व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान नाकारले आहे. त्यानंतर शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यावर होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर शिवसेना नेते व माजी मंत्री अनिल परब(Anil Parab)यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
अनिल परब म्हणाले की, शिवतीर्थावर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यास आम्हाला आडकाठी केली जात आहे. आम्हाला आतापर्यंत सात वेळा हायकोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. आताही हायकोर्ट पुन्हा परवानगी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेने पर्यायी जागा पाहिली नसल्याचे परब यांनी म्हटले असून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.
अनिल परब यांनी सांगितले की, याबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. १९६६ पासून दसरा मेळावा होत आला आहे. मात्र आता यामध्ये आडकाठी केली जात आहे. कोर्टात उद्या युक्तिवाद होईल. आम्हाला दसरा मेळाव्यासाठी कोर्टातून परवानगी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे सांगत शिवसेना आणि शिंदे गटाला परवानगी नाकारली आहे. त्यावरही परब यांनी टीका केली आहे. संघर्षाच्या ठिणग्या फक्त दादरमध्ये झडतात का, असा सवाल त्यांनी केला. वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांचा मेळावा आहे. मग, त्याच वांद्रेत मातोश्रीदेखील आहे असे सांगत परब यांनी महापालिकेच्या निर्णयाच्या विसंगतीवर बोट ठेवले.
शिवसेनेची पुढची रणनिती काय असणार आहे, या प्रश्नावर परब म्हणाले की, उच्च न्यायालय काय निर्णय देते, यानंतर आम्ही आमची रणनीति ठरवू. पालिकेने दोन्ही गटांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. कदाचित पोलिसांनी पालिकेला याबाबत अहवाल दिला असेल. या अहवालाच्या आधारावरच पालिकेने तसे पत्र दिले असेल. या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. या सर्वाचीच न्यायालयात चर्चा होईल. न्यायालय निकाल काय देणार हे पाहिले जाईल. त्यानंतर रस्त्यावरची लढाई लढायची की नाही ते ठरवले जाईल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या